पिंपरी -पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पावरील जैसे थे आदेश रद्द करुन प्रकल्प कार्यान्वित करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी विधानसभा सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सुमारे 170 कोटी रुपयांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास पिंपरी-चिंचवड शहराचा किमान 2031 पर्यंतचा पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.
तसेच, धरणातून एमआयडीसीमध्ये औद्योगिक वापरासाठी सुमारे 100 एमएलडी पाणी दिले जाते. नव्या औद्योगिक धोरणानुसार, शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन सदर पाणी औद्योगिक वापरासाठी बंधनकारक करावे. ज्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी पिण्यासाठी 100 एमएलडी पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापरही होईल. याबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षीत आहे, असेही आमदार लांडगे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
पिंपरी- चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या याचा विचार करता आगामी 50 वर्षांचा विचार करुन नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून 267 एमएलडी पाणी उपलब्ध होण्यास चालना मिळाली. त्यातील 100 एमएलडी पाणी शहरात दाखल झाले आहे. मात्र, टप्पा दोनच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार लांडगे यांनी सभागृहात सांगितले.