Chardham Yatra 2024 – उत्तराखंडमध्ये 10 मेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत 19 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी विक्रमी 55 लाख लोक आले होते, त्यामुळे अनेक वेळा व्यवस्था ढासळली होती. यातून धडा घेत उत्तराखंड पोलिस आणि पर्यटन विभागाने प्रथमच चारधाम यात्रेतील भाविकांची रोजची संख्या मर्यादित केली आहे.
पर्यटन सचिव सचिन कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात १५ हजार भाविक केदारनाथ धामचे दर्शन घेऊ शकतील, १६ हजार लोक बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊ शकतील, ९ हजार भाविक यमुनोत्रीला आणि ११ हजार भाविकांना गंगोत्रीचे दर्शन घेता येईल. म्हणजेच दररोज ५१ हजार लोक चारधामचे दर्शन घेऊ शकतील. गतवर्षी दररोज ६० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत होते.
ऋषिकेशनंतर प्रवाशांना थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर कोणाला बद्रीनाथला जायचे असेल तर त्यांना आधी श्रीनगरमध्ये थांबवले जाईल. दैनंदिन 15 हजारांची मर्यादा आल्यास भाविकांना येथेच रात्र काढावी लागणार आहे. दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया रुद्रप्रयाग, त्यानंतर चमोली, पिपळकोटी आणि जोशीमठमध्ये केली जाईल, म्हणजेच नंबर आल्यावरच आपण पुढे जाऊ शकू. श्रीनगर, रुद्रप्रयाग, उखीमठ, गौरीकुंड येथे थांबल्यानंतर केदारनाथ धामच्या भाविकांनाही पुढे नेले जाईल.
हॉटेल असोसिएशनचा विरोध
चारधाम हॉटेल असोसिएशनने या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे व्यवसाय कमी होईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष अजय पुरी यांचे म्हणणे आहे. उत्तरकाशी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र माटुडा यांच्या मते, राज्याची अर्थव्यवस्था पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांवर अवलंबून आहे. सहा महिन्यांच्या हंगामातही संख्या मर्यादित राहिल्यास व्यवसायावर परिणाम होईल. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास हॉटेल आणि होम स्टे बंद ठेवण्यात येणार आहे.