पळसदेव सरपंच निवडीविरोधातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
पळसदेव – गावात विकासकामे करत असताना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्देश ठेवून काहीजण तक्रारी करत आहेत; मात्र यापुढे असा त्रास खपवून घेतला जाणार नाही. त्रास देणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. विकास कामांच्या निविदेतील अटी यापूर्वीच्या सरपंचांनी ज्याप्रमाणे टाकल्या आहेत, त्याप्रमाणेही आम्ही त्यापुढे सुरु ठेवल्या आहेत. यामुळे कामांच्या निविदेतील अटींवर कोणीही आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही, असा पलटवार पळसदेवचे सरपंच आजिनाथ पवार यांनी केला आहे.
पळसदेव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड बेकायदेशीर झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. यामुळे सरपंचपदाची निवड कायदेशीर पद्धतीने करण्यात आलेली असल्याचा खुलासा सरपंच अजिनाथ पवार यांनी केला आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे, मेघराज कुचेकर, सदस्य अंकुश जाधव, महेंद्र काळे, स्वप्निल काळे आदी उपस्थित होते. येथील सरपंचपदासाठी 18 एप्रिलला निवडणूक कार्यक्रम झाला. यामध्ये अजिनाथ पवार व अंजना बनसुडे यांच्यात लढत झाली होती. यात अजिनाथ पवार यांचा विजय झाला; मात्र त्यांची निवड बेकायदेशीर झाल्याचा आरोप करत येथील विशाल बनसुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून घेत सदर तक्रारी अर्ज फेटाळल्याचे पत्र सरपंचांना पाठविले आहे.
राजकीय आकसापोटी विरोध करुन तक्रारी दाखल करण्याचा प्रकार म्हणजे विकास कामांना खोडा घालण्याचा प्रकार आहे. यातून गावचा विकास रखडण्याची शक्यता आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. यासाठी आमची सहकार्याची भूमिका आहे.
-भूषण काळे, संचालक कर्मयोगी साखर कारखाना
सरपंच निवडीच्या कार्यक्रमात पराभव पत्करावा लागल्याने जाणीवपूर्वक विविध तक्रारी दाखल करत त्रास देण्याचे प्रकार काहीजण करत आहेत. मात्र यातून काहीही साध्य होत नाही. राजकीय आकसापोटी विकास कामांना अडथळा निर्माण करण्याचा काहींचा हेतू आहे. यातून फक्त गावाचा विकास थांबवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पराभव झाला आहे. तो मान्य करा आणि गावच्या विकासाला मदत करा उगच वैयक्तिक स्वार्थासाठी व कामे मिळवण्यासाठी गावाचा विकास आडू नका.
-मेघराज कुचेकर