मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार यांनी रविवारी दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावरही दावादेखील सांगितला. त्यासोबतच आम्ही वरिष्ठांशी बोलूनच हा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही सुप्रिया सुळेंसमोरच सगळं ठरलं असा दावा केला होता. याच दाव्यावर त्यांनी रविवारचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी, “मी रविवारी (२ जुलै) अजित पवारांना भेटले होते. आमच्यात बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर पक्षाचे आमदार तिथे दादाला (अजित पवार) भेटायला येऊ लागले. मला वाटलं निवडणुकीची तयारी कशी करायची याची चर्चा करायला आले असावेत. दादाच्या मनात नेमकं काय चाललं आहे मला ठाऊक नव्हतं. मी तिथून निघाल्यानंतर त्याच्याकडे आलेले समर्थक आमदार आणि दादा (अजित पवार) हे राजभवनावर पोहचले.” असे स्पष्टीक सुप्रिया सुळेंनी दिले आहे.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देवगिरी बंगल्यावर मी जेव्हा अजित पवारांना भेटले तेव्हा आमची एका विषयावर चर्चाही झाली. काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी विरोधी पक्षनेते पद मला नको मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आम्ही जेव्हा बोललो तेव्हा पुढे काय होणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवारांनी शरद पवारांना सांगूनच या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का? या आशयाचा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवारांच्या निर्णयाची शरद पवारांना काहीही कल्पना नव्हती. त्यांना पुसटशी कल्पना जरी आली असती तर त्यांनी पक्ष पुन्हा उभा करण्याची मोहीम सुरु केली नसती. बंड केलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात कारवाई सुरु केली नसती असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केल्याने आपण नाराज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शरद पवारांना अंधारात ठेवून हा निर्णय झाला आहे असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.