मुंबई – राज्यात रविवारी २ जुलै रोजी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का देत शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे. भाजप जनतेचे मूळ विषयापासून दुसरीकडे लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्द्यांना चर्चेत आणत असते. पण काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल व भाजपाचा खरा चेहरा उघडा करेल. ”
पुढे ते म्हणाले, “काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही. शाहु, फुले, आंबडेकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण होत आहे हे जनतेला पटलेले नाही. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे आज आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ज्या पक्षांची सदस्य संख्या जास्त त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो.”
खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज दोन स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.