मुंबई : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे याना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री म्हटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून भाजपा नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचा उल्लेख ‘भक्तगण’ असा करत जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी काढलेल्या मोर्चात बोलत होत्या. यावेळी त्यांनी ‘जेव्हा भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत होता, त्यावेळी कार्यकर्ते चेकाळले नाहीत. पण फडतूस शब्दावर भक्तगण चेकाळले’, अशी टोलेबाजी सुषमा अंधारे यांनी केली.
या मोर्चात भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्देशून त्यांनी काही सवाल केले. त्यात त्यांनी, “रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून उद्धव ठाकरेंनी उद्वविगतेनं ‘फडतूस’ शब्द उच्चारला. तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाळले आणि चौथाळले. पण त्या भक्तगणांनी जरा विचार करावा, जेव्हा मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड किंवा भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरली. त्यावेळी भक्तगणांना राग का आला नाही? शिवराय तुमचे दैवत नाहीत का?”
दुसरा प्रश्न विचारताना सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “जेव्हा चंद्रकांत पाटलांनी अगदी सहजपणे कर्मवीर भाऊराव पाटील आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत छिछोर भाषा वापरली. तेव्हाही भक्तांना राग आला नाही. बाबासाहेब तुमचं दैवत नाहीत का? उत्तर द्या. असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आता जरा तिसऱ्या प्रश्नावर येऊयात… काल-परवा जेव्हा संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. तेव्हा काही छिछोर भक्तांनी त्या मैदानावर गोमूत्र शिंपडलं. ज्या मैदानावर आमच्या मुस्लीम भावंडांनी रोझा सोडला. ज्या मैदानावर अठरा पगड जातीचे लोक आले होते. तिथल्या मैदानावर जर तुम्ही गौमूत्र शिंपडत असाल तर हा सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांचा अपमान नाही का? पण यावरही भक्तगण चेकाळले नाहीत. मात्र ‘फडतूस’ शब्दांवर भक्तगण प्रचंड चेकाळले. म्हणजे तुम्हीच विचार करा, भक्तांचा चॉईसही किती फडतूस आहे.” असे म्हणत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.