नगर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते व पाणीपरिषदेच्या माध्यमातून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या त्यांच्या प्रकल्पाची सुरुवात युती सरकारच्या काळात आपण केली होती. त्यामुळे आता नगर-नाशिक-मराठवाड्याचा पाणी वाद मिटावा यासाठी या प्रकल्पांसह कुकडी व साकळाई प्रकल्प पूर्ण करून येत्या ५ वर्षात दुष्काळी भाग जलमय केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.
महायुतीचे नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी संत निरंकारी मिशनच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाविजय संकल्प सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उमेदवार डॉ. सुजय विखे व सदाशिव लोखंडे तसेच जिल्ह्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते.
२०१४ व २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींच्या याच मैदानावर झालेल्या सभांच्या गर्दीचे रेकॉर्ड आजच्या सभेने मोडले आहे, असे आवर्जून सांगून फडणवीस म्हणाले, नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर केले आहे व ते आता मोदींच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात येईल. मोदींच्या जादूमुळे माझ्या जन्माच्या आधीपासून सुरू झालेला निळवंडे प्रकल्प मोदींमुळेच पूर्ण झाला आहे.
चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग नगरला जोडले आहेत, चार एमआयडीसी होत आहेत. यामुळे नवे उद्योजक येतील व रोजगार मिळेल. औद्योगिक जिल्हा होईल. सीएम सोलर योजनेतून येत्या १८ महिन्यात प्रत्येक शेतकर्याला दिवसा १२ तास ३६५ दिवस वीज दिली जाणार आहे. शिर्डीत नवे एअरपोर्टही केले जाणार आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुकडी व साकळाई पाणी योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याने आता प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली तसेच पश्चिम वाहिनीचे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोर्याचा नगर-नाशिक, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र परिसर दुष्काळमुक्त करण्याची मागणी केली.
शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी घाटमाथ्यावरून वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी अडवून त्यापैकी २५ टीएमसी पाणी नगर जिल्ह्याला देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली तर नगर मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी, केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना सर्वांच्या सहकार्याने राबवल्या असल्याने यंदाच्या लोकसभेत मी अहिल्यानगरचा खासदार म्हणून प्रवेश करेल, असा विश्वास व्यक्त केला.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात, पण विरोधकांकडून विकासाचे मुद्दे मांडले जात नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेची उमेदवारी दिली व पाच वर्षात मी सार्थ काम केले. त्यामुळे देशाचा पंतप्रधान व नगरचा खासदार बदलणार नाही, मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होतील व मी दुसर्यांदा खासदार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही लढाई विकासाची, देश हिताची, देशाच्या संरक्षणाची व सर्वसामान्यांच्या पाठबळासाठीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. संग्राम जगताप, आ. मोनिकाताई राजळे, आ. प्रा. राम शिंदे, बाबूशेठ टायरवाले आदींची भाषणे झाली. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप भालसिंग यांनी आभार मानले.
नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा कार्य अहवाल व सिद्धी संकल्प अहवाल (व्हीजन डॉक्युमेंट) यांचे प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान मोदींचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर मोदी मोदी घोषणांची परिसर दुमदुमला.