शिरूर, – इंडिया आघाडी आता अतिरेकी कसाबची भाषा बोलू लागली आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांना टोला लगावला. वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आमची महायुती मात्र कसाबला फाशीची शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन बाजू लढविणार्या उज्ज्वल निकमांसोबत आहे.
करकरेंचा मृत्यू कसाबच्या गोळीने नाही तर एका अधिकार्याच्या गोळीने झाला, असे वक्तव्य वडेट्टीवारांनी केले होते. त्याचा समाचार फडणवीस यांनी घेतला, ते पुढे म्हणाले की, ही देशाची निवडणूक आहे, शिरुरचा वाहतूककोंडीचा प्रश्न, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नितीन गडकरी, मी, आढळराव यांच्या समन्वयातून बैठका झालेल्या आहेत. दोन वर्षात हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यासाठी आढळराव यांना साथ देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरुर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. पाच कंदील चौक येथे झालेल्या या सभेला कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, आमदार महेश लांडगे, राहूल कुल, माजी आमदार पोपटराव गावडे, योगेश टिळेकर, रघुनाथ शितोळे, भाजप नेते निरंजन डावखरे, जयश्री पलांडे, आशाताई बुचके, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, युवा नेते राहुल पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, राजेंद्र नाथा शेवाळे, संजय रौंधळ, राजेंद्र जासूद, शरद कालेवार, सुभाष जगताप, नितीन पाचर्णे, आदी उपस्थित होते. दरम्यान विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते गणेश कवडे यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला.
शिरुरच्या विकासासाठीच पाठबळ द्या..
शिरुर मतदारसंघातील खेड-सिन्नर रस्ता बायपासचे काम पूर्ण झाले आहे. शिरुरसाठी 72 कोटींची पाणीयोजना मंजूर केली आहे. संभाजी महाराजांच्या स्मारकाचं 400 कोटींच्या निधीतून काम मार्गी लागणार आहे. आता पुणे-नाशिक रेल्वे, वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही हजार कोटींचा निधी लागणार आहे.
या निवडणुकीनंतर शिरुरच्या चार गावांचा पाणीप्रश्न, जुन्नरच्या आणे पठाराचा पाणीप्रश्न आणि आंबेगावच्या सातगाव पठारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यास माझा प्राधान्यक्रम असणार आहे. -शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे शिरुरचे उमेदवार
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
-बैलगाडा शर्यत बंद झाली होती. अडीच वर्षं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी काहीही केलं नाही. आपलं सरकार परत आलं आणि आपण बैलगाडा शर्यत सुरु केली. त्यामागेही आढळराव पाटील यांचेच प्रयत्न होते.
-जरा समोरच्या उमेदवाराला विचारा की त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या. गेल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि कुठे जाणार होते आणि कसे थांबले. ते आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा उघड होईल.
-आढळरावांपेक्षा एक गोष्ट त्यांना चांगली जमते. आढळराव नाटक करत नाहीत, ते एवढे नाटकी आहेत की त्यांना खोटं रडता येतं, हसता येतं, जुमलेबाजी करता येते, गोड गोड बोलता येतं पण त्याला जनता भुलणार नाही!