मुंबई – महाविकास आघाडीकडून मुंबईत ‘मशाल मोर्चा’ काढला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेनंतर महाविकास आघाडी आता मुंबईत मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेसकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी हा मोर्चा काढला जाणार आहे. बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानुसार, येत्या 11 एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसरपर्यंत हा मशाल मोर्चा काढला जाणार आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटाविरोधात राज्यभर वज्रमूठ सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. यावेळी विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेप्रसंगी “महाराष्ट्र त्यांना स्वीकारत नव्हता, तेव्हा आम्ही भाजपला खांद्यावर घेवून फिरवले. शिवसेनाप्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी रक्त सांडले ते देशासाठी पण तेच आज आपल्याला लाथ देत आहेत. आमचे शिवसेना नाव चोरले, धनुष्यबाण चोरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून नामषेश केल्याशिवाय शांत बसणार नाही,’ अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली होती.