मुंबई – औरंगाबाद जवळील करमाड येथे मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले कि, औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. करोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं, असेही त्यांनी सांगितले आहे.
असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 8, 2020
तसेच, राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.
राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 8, 2020
दरम्यान, जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद रेल्वे दुर्घटने प्रकरणी रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.