Sharad Pawar | Sunetra Pawar | Supriya Sule – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात जोरदार लढत होत आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीचे होम गाऊंड ढवळून निघाले आहे. सध्या ही लढाई अटीतटीवर येऊन ठेपली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी काकांशी फारकत घेऊन महायुतीचा रस्ता धरला. त्यानंतर बारामती लोकसभेतील समीकरणे बदलून गेली आहेत. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होताना बारामती, इंदापूर, दौंडचे शिलेदार हे त्यांच्यासमवेत गेले आहेत.
त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंडची राजकीय ताकद ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तीन तालुक्यांत सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीतील मातब्बर नेत्यांची फौज आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी संपूर्ण शरद पवार गट उभा आहे.
दरम्यान, अश्यातच पवार कुटुंबातील दोन महिलांमध्ये सुरु असलेल्या राजकीय लढतीबाबत स्वतः शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत शरद पवार यांनी या निवडणुकीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांना ‘पवारांना पवारच रोखू शकतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उंभ करण्यात आलंय का?’ असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हे आता मी कसं सांगू? लोकशाहीत कुणालाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
त्यांनी निर्णय घेतला.अजित पवार गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत उभे होते तेव्हा ते भाजपकडून उभे नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलले की, आम्हाला बारामतीत शरद पवारांचा पराभव करायचा आहे.
त्यांची ती इच्छा आहे. त्यांनी तसा निर्णय घेतलेला दिसतोय. आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही आहे की, मी स्वत: उमेदवार नाही”. अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
शरद पवार पुढे म्हणाले, “मी बारामतीत 1967 साली पहिल्यांदा निवडणूक लढलो. त्यापासून आजपर्यंत मी कंटीन्यू जिंकत आलो आहे. फक्त मी लोकसभेत गेलो, तेव्हा विधानसभेत गेलो, राज्यसभेत गेलो त्यावेळेस विधानसभा सोडली, पण सातत्याने जिंकत आलो आहे.
मी पहिल्यांदा 1967 ला निवडणूक लढवली. तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत कधी विधानसभा, कधी लोकसभा, राज्यसभा मी सातत्याने जिंकून येत आहे’ असं देखील शरद पवार म्हणाले.