पिरंगुट, (वार्ताहर) – शरद पवार, उद्धव ठाकरे हे स्वतःसाठी लढत नसून महाराष्ट्र, भारत देश आणि या देशाचे संविधान वाचविण्यासाठी काम करताहेत. राहुल नार्वेकरांनी पक्षांबाबतचा दिलेला निकाल हा संविधानाला लागलेली पहिली ठेच आहे. हे सरकार सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल. त्यामुळे हे संविधान त्यांना बदलायचे आहे.
त्यातूनच जॉइन ऑर जेलची पॉलिसी भाजपाने अवलंबली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार व भाजपावर टीका केली.
घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील चौकात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी नानासाहेब नवले, अतुल लोंढे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, संग्राम थोपटे, रोहित पवार,
सचिन आहिर, तुषार कामठे, शंकर मांडेकर, संतोष मोहोळ, महादेव कोंढरे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, सविता दगडे, शालिनी देशपांडे, संगीता पवळे, स्वाती ढमाले, दगडु करंजावणे, बाबाजी शेळके, राहुल पवळे, कोमल वाशिवले, निकिता सणस, निकिता रानवडे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकरी विरोधी असलेल्या भाजपाने राज्यातील उद्योग गुजरातला पाठविले. नवीन उद्योग महाराष्ट्रात आणले नाहीत. भ्रष्टाचारी लोकांना सरकारमध्ये मंत्रीपदे दिली. काळा पैसा, प्रत्येकाच्या खात्यात पैसे, दुपटीचे उत्पन्न, प्रधानमंत्री आवास योजना यांसारखी आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाहीत. यावेळी नानासाहेब नवले म्हणाले, ’मुळशीचा विकास शरद पवार यांनी केला असून उपकारकर्त्याला विसरले जाते, ही खेदाची बाब आहे.
संग्राम थोपटे म्हणाले, भोर मतदार संघातील जनता सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आहे. यावेळी चारशे पार ऐवजी मुळा मुठा नदी पार अशी भाजपाची अवस्था असेल. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप नेते विकास करण्याऐवजी गुजराती नेत्यांना खूश करण्याचे काम करत आहे.
ही लढाई मराठी स्वाभिमानाची आहे. दडपशाहीचे राजकारण चालू आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचे खरे अध्यक्ष असल्याचे मी समजते. शिवसेनेने मोठी ताकद माझ्या पाठीशी असून शिवसेना आणि काँग्रेसचा चांगला परफॉर्म आहे. सरकारने शेतकर्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. आरक्षण, महागाई, भ्रष्टाचार, उद्योग या सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही संविधान बदलू देणार नाही. -सुप्रिया सुळे, खासदार बारामती