पावसाळ्यात रेल्वे संचलनात येणारे अडथळे कमी करण्याचा प्रयत्न
– कल्याणी फडके
पुणे – मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतात. दरवर्षी प्रशासनाकडून याबाबत उपाययोजनादेखील करण्यात येतात. यंदा मध्य रेल्वेकडून एप्रिलमध्येच मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली असून पावसाळ्यात रेल्वे गाड्यांच्या संचलनात येणारे अडथळे कमी करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये रुळांवर पाणी साचणे, दरड कोसळणे, रेल्वे मार्गीकांच्या खालील भराव वाहून जाणे, ओव्हरहेड वायरच्या प्रवासात अडथळा येणे आदी कारणांमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. दरवर्षी याबाबत रेल्वे प्रशासनाकडून 31 मेपूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात येतात. यासाठी ब्लॉकदेखील घेण्यात येतात. मागील वर्षी देखील पावसाचा मोठा फटका बसून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या बरोबरीने इंटरसिटी आणि उपनगरीय गाड्यादेखील रद्द झाल्या होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.
मागील महिनाभरापासून केवळ मालवाहतूक गाड्या आणि पार्सल गाड्यांचे संचलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हे अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक असणारी कामे वेगाने सुरू आहेत.
मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये पावसाळा पूर्व कामांना सुरुवात झाली असून, यामध्ये प्रामुख्याने रेल्वे मार्गिकेच्या शेजारील नाले सफाई, रेल्वे मार्गिकेची दुरुस्ती ही कामे हाती घेतली आहेत.
सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामे सुरू
पुणे विभागामध्येदेखील ही कामे हाती घेतली आहे. यामध्ये सुरुवातीला विभागातील नाले आणि कल्वर्टची साफसफाई करण्यात येत असून, पाणी साचून राहू नये आणि रेल्वे मार्गीकेवर पाणी येऊ नये यासाठीदेखील उपाययोजना करण्यात येत आहे. कमीत कमी कामगारांच्या उपस्थितीत ही कामे करण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्यात आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.