-शर्मिला जगताप
इ.स. 1920च्या सुमारास हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. या शोधामुळे भारतीय संस्कृती ही जगातील पुरातन संस्कृती ठरली. या शोधामुळे भारताचे नाव जगासमोर आले. पुढे मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खननात आढळलेली नागरी संस्कृती तर भारताचा वैभवाचा कळस दर्शवित होती.
जगाच्या इतिहासात ग्रीक, इजिप्त या पुरातन संस्कृती असलेल्या देशांच्या पंगतीत भारताला स्थान मिळाले. सिंधू नदीकाठी हे पुरातन शोध लागल्याने याला “सिंधु संस्कृती’ म्हणून ओळखले जाते. पुढे भारतातील अनेक ठिकाणी उत्खननाचे काम सुरू झाले. यात ऐतिहासिक वस्तू सापडू लागल्या. यामुळे भारताचा इतिहास पुन्हा नव्याने सोनेरी अक्षरात लिहिला गेला.
भारत प्राचीन देश असल्यामुळे ऐतिहासिक पाऊलखुणा आजही आढळतात. कालच तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर गोदावरीची उपनदी असलेल्या मंजिरा नदीकाठी सुमारे 2 हजार 300 वर्षे जुना शिलालेख आढळला आहे. या शोधामुळे इतिहासाला नवीन कलाटणी मिळणार आहे तसेच भारतीय संस्कृतीतही मोलाची भर पडणार आहे.
हा शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. पाषाण किंवा धातूवर लिहिलेल्या लेखाला शिलालेख म्हणतात. संशोधकांनी टेराकोटा धातूवर लिहिलेल्या या शिलालेखाचा शोध लावला आहे. या ब्राह्मी शिलालेखावर प्राकृत भाषेत “नंदीपत’ प्रतिकासह “देवनम’ लिहिले आहे. यावरून अंदाज वर्तविला जात आहे की, हा शिलालेख इ.स.पू. तिसऱ्या शतकातील आहे. याप्रकारचे अंकन मौर्य वंश सम्राट अशोकाच्या काळात आढळून येते.
इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्व संशोधक एम. ए. श्रीनिवास आणि त्यांच्या टीममध्ये असलेले बी. शंकर रेड्डी, बी. नागराजू आणि एन. अरुण कुमार यांनी हा शिलालेख शोधला आहे. तेलंगणातील मेदक जिल्ह्यातील कुलचारम जवळ मंजिरा नदीच्या दोन वितरिका निर्माण झाल्या आहे. या दोन्ही वितरिकांमध्ये एक द्वीप निर्माण झाले असून या ठिकाणी हा शिलालेख आढळला आहे.
भारतीय इपिग्राफीचे डायरेक्टर डॉ. डी. सूर्यकुमार यांनी तेलंगणामध्ये सापडलेल्या या शिलालेखामुळे इतिहासातील अनेक पाऊलखुणा सापडतील असे म्हटले आहे. हा शिलालेख इतिहास नव्याने अभ्यासण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. श्रीनिवास यांच्यानुसार येथे आणखी उत्खनन केल्यास अतिप्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू सापडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येथून फक्त एक किलोमीटर अंतरावर गुंफा आहेत. येथे या अगोदर बौद्धकालीन शिलालेख मिळाले आहेत. या गुंफा नवपाषाण युगातील असल्याने सांगितले जाते. हे क्षेत्र जवळपास शंभर एकरात पसरलेले आहे.
आज आपण पाश्चात्य संस्कृतीची नक्कल करतो. मात्र, इतिहासात डोकावले तर भारत प्राचीनकाळी सर्वात प्रगत आणि समृद्ध देश असल्याचे इतिहासातील पाऊलखुणा सांगतात. धर्म, राजकारण, समाज आणि संस्कृती यात भारत अग्रेसर होता आणि भारतात व्यापार करण्यास आलेल्यांनी त्यांच्या देशांत आपलीच संस्कृती रुजवली.