सुविधा नव्हे शिक्षा -3
पिंपरी – काही रिक्षा चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याकडे बॅच बिल्लाही नसतो. असे रिक्षा चालक प्रवाशांना दादागिरी करतात. प्रसंगी मारहाणही करतात. अशा रिक्षा चालकांची संख्या मोठी नसली तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
उदाहरण 1
दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी परिसरातील एक कुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र त्यानंतर पावसाची रिमझिम सुरू झाल्याने त्यांनी रिक्षाने घरी जाण्याचा निर्णय घेतला. तोंडओळखीच्या रिक्षा चालकाच्या रिक्षातून घरी गेल्यावर अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षा चालकाने त्या कुटुंबाकडे दोनशे रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी रिक्षा चालकास एवढे पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून त्यास जखमी केले.
उदाहरण 2
करोनाच्या काळात रात्रपाळीत काम करून एक महिला परिचारिका बस बंद असल्याने सकाळी सहा वाजताच्या सुमारास रिक्षातून घरी जाण्यास निघाली. मात्र रिक्षा चालक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहात होता. यामुळे तिने रिक्षा चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र तरीही त्याने रिक्षा तशीच पुढे नेली. पुढील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्या महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारली. ही घटना देखील तीन महिन्यांपूर्वी गांधीनगर, पिंपरी येथे घडली.
प्राणघातक शस्त्रांचाही वापर
काही रिक्षाचालक मनमानी भाड्यावरून प्रवाशांची वाद घालतात. प्रसंगी प्रवाशाला दमदाटी करतात. इतर रिक्षाचालक कमी भाड्यामध्ये प्रवासी नेण्यास तयार असूनही त्यास दादागिरी करून नेऊ दिले जात नाही. असा अनुभव अनेकांना आला आहे. मात्र अनेकदा प्रवासी कटकट नको म्हणून तक्रार देण्याचे टाळतात. प्रवासी भरण्याच्या कारणावरून रिक्षा चालकांमध्येही अनेकदा हाणमारी झाली असून त्यामध्ये प्राणघातक शस्त्रांचा वापर केला गेला आहे. अशा घटनांमुळे रिक्षा चालकांमधील गुन्हेगारी समोर येत आहे. यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे
रिक्षा चालविण्यासाठी बॅच बिल्ला असणे अनिवार्य आहे. हा बिल्ला काढण्यासाठी पोलिसांकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते. सध्या रिक्षा चालक व्यवसायात असलेल्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अशा चालकांना बॅच बिल्ला मिळत नाही. यामुळे गुन्हेगारी स्वरूपाचे रिक्षा चालक कोणत्याही परवान्याशिवाय रिक्षा चालविताना दिसत आहेत. यामध्ये काही अल्पवयीन रिक्षा चालकही आहेत. इतर राज्यातून आलेल्या गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेले काहीजण आज शहरात व्यवसाय करीत आहेत. पोलिसांनी वेळोवेळी रिक्षांची तपासणी करून गुन्हेगारी स्वरूपाच्या बॅच बिल्ला नसणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.