पिंपरी – देशात दर दहा मैलांवर मराठी भाषा बदलत जाते. मराठी भाषेमधील हा फरक नसून भाषा समृद्धीचा दागिनाच आहे. मराठी भाषेचा विचार व्यवहारात आणावा, यासाठी जागतिक मराठी संमेलनाची संकल्पना मांडली. आज संत तुकारामनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन होत आहे, याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी केले.
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 18 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या संमेलनाचे आयोजन जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, स्वागताध्यक्ष डॉ. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री यशवंतराव गडाख, रमाकांत खलप, दिग्दर्शक नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, उद्योजक अरूण फिरोदिया, डॉ. प्रमोद चौधरी आदीसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, जागतिक मराठी संमेलन जर्मनीत आयोजित केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने त्याला विरोध केला होता. काही मागण्यांसाठी तो विरोध होता. त्या वेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होतो. संमेलन व्यवस्थित होण्यासाठी सर्व साहित्यीकांना पुणे ते मुंबई पर्यंत विमानाने घेऊन गेलो. पुढे संमेलन सुरळीत पार पडल्याचे पवारांनी सांगितले. गोव्यात पोर्तुगीज आक्रमणानंतरही मराठी भाषेची अस्मिता जपली गेली आहे. त्यामुळे पुढील संमेलन गोव्यात घेतले जाईल, असेही पवार म्हणाले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जगभरात पसरलेला मराठी माणूस एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. मराठी भाषेची वाढती भूक पुर्ण करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळभ म्हणाले. खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली
मराठीची संस्कृती जपणे गरजेचे
संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, संत परंपरेने वैश्विक संकल्पना मांडली. मराठा प्रांत पुर्वी व्यापक होता. कालांतराने त्याच्या वैचारिक सीमा, कार्याच्या सीमा मर्यादित झाल्या. भाषावार प्रांतरचनेतून आपलीच अस्मिता कमी झाली. मराठी भाषेची संस्कृती जपणे गरजेची आहे. हैद्राबाद, दिल्ली, कानपूर येथे मराठी चालणाऱ्या शाळांची दुरवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांवर मराठी माणूस बसेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने देशाला वैचारिक दिशा द्यावी, असे प्रतिपादनही मुळे यांनी केले.
म्हणून संसदेत जायला भीती वाटते
शरद पवार यांच्या तालमीत आपण घडल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या भाषणातील हाच धागा पकडून शरद पवार म्हणाले, माझ्या तालमीत सुशीलकुमार शिंदे घडल्याचे म्हणाले. मात्र, हल्ली मला या वाक्याची भिती वाटते. कारण काही महिन्यांपुर्वी माझे बोट पकडून कोणीतरी राजकारणात आल्याचे सांगितले. त्या वाक्याने आज देखील संसदेत आज देखील जायला मला थोडी भीती वाटते, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांचे नाव घेता शरद पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.