मुंबई: मराठवाड्यात वॉटर ग्रिड व नद्याजोड प्रकल्प राबविण्यासाठी जलसंपदा, पाणीपुरवठा विभाग तसेच सेवानिवृत्त तज्ज्ञ अधिकारी आणि आमदार यांच्या सहभागाने चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी आणि मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
मराठवाड्यातील वॉटर ग्रिडची कामे पूर्ण करण्याबाबत विधानसभा सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबाबत शासनाची भूमिका विधानसभेत स्पष्ट केली.
मराठवाड्यातील काही धरणं चांगली भरतात. परंतु ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागातील धरणं भरत नाहीत. त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कमी पाण्याच्या भागाला देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. वॉटरग्रिड सुरू ठेवण्यासाठी वीजेचा खर्च अधिक आहे. हे विज बील कोणती शहरं भरणार याचा विचार करावा लागेल. जायकवाडीचे पाणी पैठणला देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लातूरला पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या योजनेचे वेगवेगळे टप्पे करण्यासंदर्भातही विचारविनिमय सुरू आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेच शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे याबाबत अधिवेशन संपल्यावर प्राधान्याने विचार करून हे प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगतानाच यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.