नगर -देशात 23 मार्चपासून टाळेबंद लागली असून, महिनाभरापासून अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. लहान-मोठे व्यवसाय करून प्रपंच चालविणाऱ्यांची कामेही बंद झाली आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. एक व्यवसाय बंद होताच दुसरा सुरू केला आहे. सरकारने या टाळेबंदीतून औषधालय, किराणा आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक गोष्टी वगळल्या आहेत.
त्यामुळे अनेकांनी भाजीपाला आणि फळे विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरात अचानक भाजीपाल्याची आणि फळांची दुकाने वाढली आहेत.करोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात 20 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय बंद आहेत. यात छोट्या व्यवसायिकांचे हाल होत आहे. हात पोट असणाऱ्यांचा रोजगार गेल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न पडला आहे. विशेषत: रस्त्यावर दुकाने थाटून विविध वस्तू विक्रेते, रिक्षाचालक, विविध ठिकाणी मजूरी करणारे यांचा रोजगारच बंद झाला आहे. लहान-मोठे व्यवसाय करून प्रपंच चालविणाऱ्यांची कामेही बंद झाली आहेत. कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते भरण्यापासून ते कुटुंब चालविण्याच्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा चालू आहेत. त्यात दरखाने, मेडिकल, बेकरी, किराणा दुकान, दुध, भाजीपाला, फळ विक्री करता येत आहे. हाताला काम नसल्याने अनेकांनी भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने थाटून आर्थिक प्रश्न काही अंशी कमी करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. मेडिकल, किराणा दुकान टाकणे शक्य नसल्याने भाजीपाला व फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करता येत असल्याने तसेच या व्यवसायाला सध्या वाव असल्याने गेल्या 15 ते 20 दिवसात नगर शहरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळ विक्रेते वाढले आहेत.
रिक्षाचालक, रिक्षा टेम्पोचालकांनी सर्रास भाजीपाला व फळ विक्री सुरू केली आहे. त्यात घरोघरी फिरण्यास भाजीपाला व फळविक्रेत्यांना मुभा असल्याने रिक्षा व टेम्पोचालकांकडून फिरून विक्री केली जात आहे. सध्या टरबूज व खरबूज यांची विक्री मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. अन्य फळ उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळ विकत घेवून त्यांची विक्री करण्यात येत आहे.
जवळची गुंतवणूक केल्याने जोखीम असून व्यवसाय बुडाला तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्वांनी जोखीम घेऊन हा व्यापार सुरू केला. आर्थिक प्रश्न मिटला नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाल्याची भावाना व्यक्त होत आहे.
यातही सोपा मार्ग म्हणून फळे आणि भाजीपाला विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच की काय शहरात भाजी विक्री आणि फळे विक्रीची दुकाने वाढल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार गंभीर पण…लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेला असताना अशाप्रकारे व्यवसाय सुरू करणे चिंतेचे कारण आहे. लोकांचा रोजगार गेल्याने पर्याय नसल्याने वेगळे मार्ग निवडले आहेत. मात्र अचानक भाजीची दुकाने वाढणे हा सुद्धा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.