हिंजवडी – किवळे येथील होर्डिंग्ज दुर्घटनेला दोन महिने होत नाही तोच आयटीनगरी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंजवडीतत मंगळवारी (दि. 30) दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात चार ते पाच अनधिकृत होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तरी पावसामुळे होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्या व काही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आता तरी प्रशासन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
आयटीनगरीच्या फेज एकमधील वेगबियोर स्कूल समोर महाकाय होर्डिंग कोसळल्याने दोन दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु जखमींना कुठल्या रुग्णालयात नेण्यात आले याची माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले.
आयटी परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या वेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने हिंजवडी, मारुंजी रस्त्यावर दोन ठिकाणी तर एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग कोसळले.
यामध्ये मारुंजी रस्त्यावरील दिसले नर्सरीजळील होर्डिंग कोसळल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, त्याच रस्त्याला कीर्तीगेटच्या पुढे एक होर्डिंग एका संपर्क कार्यालयावर व आलिशान कारवर कोसळल्याने चक्का जाम झाला होता. ढवळे बेंद्रे वस्तीवर देखील एक महाकाय होर्डिंग तसेच अनेक दुकानदारांचे बोर्ड कोसळले होते. यामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला होता.
घटनेनंतर तत्काळ हिंजवडी पोलिसांनी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पथकाने तसेच वाहतूक पोलिसांनी आयटीतील वाहतूक सुरळित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गॅस कटरने लोखंडी सापळा कापून क्रेन लावून सर्व होर्डिंग रस्त्यातून बाजूला करण्यात आले.
या दुर्घटनेत जरी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दोघेजण जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आयटी परिसरात अनधिकृत होर्डिंगचे मोठे पीक फोफावले असून, सर्व रस्त्यांवरील इमारती व दुकानांवर विनापरवाना ही होर्डिंग उभारले आहेत. याबाबत “दै. प्रभात’ने वारंवार बातम्या प्रकाशित केल्या आहेत.
धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई व त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्याचे तंतोतंत अंमलबजावणी त्या त्या संस्थांनी केली पाहिजे.
– रणजित भोसले,तहसीलदार, मुळशी
आता तरी प्रशासनाला जाग येणार का?
किवळे दुर्घटनेनंतर शहरात महापालिकेच्या वतीने कारवाई मोहीम सुरू झाली. याच धर्तीवर जिल्ह्यातील धोकादायक अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही गेंड्याची कातडी परिधान केलेल्या जिल्हा प्रशासनाला जाग येत नाही. प्रशासन लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे काय? या मोठ्या दुर्घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल हिंजवडीतील नागरिक उपस्थित करत आहेत.