५० गावांतील ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेस्तव बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी) – मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, कासारी, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, तांब्रपर्णी आदी नद्यांच्या पात्रांनी धोकादायक पातळी गाठली आहे. तर कोल्हापूरला पंचगंगेचा विळखा बसला आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी तब्बल ४८ फुटांवर पोचली आहे. या धोकादायक महापुराचा फटका महावितरणलाही मोठ्या प्रमाणात बसला असुन गांधीनगर व मलकापूर या शहरी भागांसह ५० गावे, ११ वाड्यांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागला आहे. नदीकाठच्या, सखल भागातील ३ हजार ४० रोहित्रे बंद ठेवण्यात आली असून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे.
कोल्हापूर शहरात बापट कॅम्प येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून गांधीनगर भागाला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही वाहिनी जाते. पुराचे पाणी वीजवाहिनीपर्यंत पोहोचल्याने सोमवारी (दि. ५) सकाळी गांधीनगर भागाचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागला. जवळपास ७ हजार २५० ग्राहकांना याचा फटका बसला असून संध्याकाळपर्यंत इतर दुसऱ्या स्त्रोतामार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम मार्केटयार्ड उपविभागाची टीम करत आहे. जाधववाडी, शिरोली पुलाची या भागातील २५ रोहित्र बंद असून यावरील आठशेवर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद केला आहे.
कोल्हापूर शहराप्रमाणेच जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज परिस्थिती नाजूक बनली आहे. चंदगडच्या तुडिये, इचलकरंजीच्या आवाडेमळा येथील वीज उपकेंद्रात पुराचे पाणी शिरले आहे. चंदगड तालुक्यातील कुदनूर, कालकुंद्री, राजगोळी बु., राजगोळी खु., तळगुली, चिंचणे, दिंडलकोप, कामेवाडी, चनेट्टी, यरतेंहत्ती, राजेवाडी, खनेटृी या गावांचा वीजपुरवठा खबरदारी म्हणून बंद केला आहे.
नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार महापुरामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील ३०४० रोहित्र बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे एकूण ४६ हजार १८४ वीज जोडण्या बाधित झाल्या आहेत. आतापर्यंत विजेचे ३३३ खांब जमीनदोस्त झाले होते. विशेष म्हणजे त्यातील ८० खांब भरपावसात उभे करण्यात आले आहेत.