नवी दिल्ली: आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यासंदर्भात राज्यसभेत प्रस्ताव मांडला. त्यामुळे विरोधकांनी राज्यसभेत चांगलाच गोंधळ केला. अमित शहा म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात येईल. तसेच त्यामधील फक्त १ ब्लॉक राहील. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश बनविण्यात येईल. आणि जम्मू-काश्मीर विधानसभेसह केंद्र शासित प्रदेश असेल.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० संपविण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला फार आनंद होत आहे. आडवाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जनसंघ स्थापनेपासून आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० संपविण्याची मागणी करीत आहोत. आज ती पूर्ण झाली. सरकारच्या या निर्णयामुळे देश अधिक बळकट होईल. तसेच आडवाणी यांनी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.
आडवाणी पुढे म्हणाले, हा निर्णय जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या विकासास बळकट करेल. भारतीय जनसंघाच्या काळापासून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० संपविणे हा पक्षाचा अजेंडा राहिला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करणे हा एक मोठा मुद्दा होता. ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी आपल्या भाषणांमधून कलम ३७० संपुष्टात आणण्याचे आश्वासन पुन्हा पुन्हा दिले होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपा अध्यक्षांनी जम्मू-काश्मीरमधील आपल्या निवडणूक भाषणात म्हटले होते की, सरकार स्थापनेच्या १०० दिवसांतच ते काश्मीरमधील कलम ३७० रद्द करतील. राज्यसभेत जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केली, तेव्हा देशातील अनेक पक्षांनी त्याचे स्वागत केले.