पदाधिकाऱ्यांत संमभ्रावस्था
बारामती – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीत जल्लोष झाला. याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे काहीशी अस्वस्थता पसरली. आपण अजित पवारांसोबत असल्याचा निर्धार समर्थकांनी व्यक्त केला.
एकीकडे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आणि दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत विरोधी भूमिका घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता होती.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहिती नव्हता, अशी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर पुढे आता नेमके काय याबाबतच घराघरात चर्चा सुरु होती. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांना साहजिकच आनंद झाला.
त्यांचा कामाचा धडाका व वेग माहिती असल्याने आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर विकासाला अधिक गती मिळणार, यामुळे बारामतीकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सत्तेत तेही उपमुख्यमंत्री म्हणून दादा सहभागी झाल्यानंतर विकासाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याची भूमिका अनेक भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही मांडली.
त्याचवेळेस शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उद्यापासूनच नव्याने संघटना बांधणी करणार असल्याचे जाहीर केले. युवक व कार्यकर्त्यांवर माझा दृढ विश्वास असल्याचे त्यांनी जाहीर केल्यानंतर आता पुढे नेमके काय होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत आहे, नरेंद्र मोदी यांच्यासमवेत गेल्यास राज्याचा विकास वेगाने होईल हे सूत्र नजरेसमोर ठेवून अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी नमूद केले.
मतभेदानंतर काहीतरी एक भूमिका घ्यायची वेळ येते की काय, अशीही भीती काहींनी बोलून दाखवली. अजून काही दिवसानंतर राष्ट्रवादीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे अनेकांना वाटत आहे.
दादा म्हणतील तेच धोरण
बारामती सहकारी बॅंकेचे चेअरमन सचिन सातव म्हणाले की, अजित पवार हेच आमच्यासाठी बांधतील तेच तोरण, अशी आमची भूमिका आहे.त्यांनी बारामतीकरांना डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला आहे.त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.
दुसरीकडे शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याने आता पुढे नेमके काय घडणार, यामुळे काही कार्यकर्ते चिंताग्रस्तही झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांचा आशीर्वाद गरजेचा आहे, अशीही भूमिका काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. याबाबत थेट प्रतिक्रिया काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी दिली असली तरी काही काळ वाट पाहू, अशीच भूमिका बारामतीत अनेक कार्यकर्त्यांची आहे. शरद पवार यांचा आशीर्वादही तितकाच महत्वाचा असल्याचे काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखविले.
आम्ही अजितदादांबरोबर आहोत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे बारामतीकरांना महाराष्ट्राला फायदा होईल. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने बारामतीकरांच्या हिताचाच हा निर्णय आहे.सत्तेत असल्याने बारामतीत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण होतील. बारामतीचा मोठा विकास पूर्ण होईल. महाराष्ट्रासाठी देखील हा निर्णय चांगला आहे.
-जय पाटील, बारामती शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.