पुणे – घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गेल्या 24 तासात बहुतांश भागात शंभर मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. दरम्यान, दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा घाटमाथ्यावर पाऊस वाढेल. काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
मागील तीन दिवसांपासून बहुतांश घाटमाथ्यावर शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाट, अंबवने, शिरगाव या भागात 200 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, गेल्या 24 तासात पावसाचा जोर ओसरला आणि वाणगाव वगळता अन्य घाटमाथ्यावर पाऊस कमी झाला. वाणगाव येथे सर्वाधिक 101 मिमी पावसाची नोंद झाली. तर कोयना परिसरात 95, शिरगाव आणि खोपोली घाटमाथ्यावर प्रत्येकी 70, ताम्हिणी घाटात 64, डुंगरवाडी येथे 77, धावडीमध्ये 85 आणि लोणावळा परिसरात 58 मिमी पावसाची नोंद झाली.
शहरात सकाळ, संध्याकाळ रिपरिप
शहरात सकाळ-संध्याकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. आज दिवसभरात रात्री आठ वाजेपर्यंत 5 मिमी पावसाची नोंद झाली. वरुणराजाने आज सकाळी हजेरी लावली. अधून-मधून सरी कोसळत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पाचनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सुटीच्या दिवशी खरेदी आणि फिरण्यासाठी आलेल्या पुणेकरांची धांदल उडाली. पाऊस आणि वाहतूक कोंडी हे समीकरण आता नित्याचे बनले असून, आजही शहराच्या काही भागात कोंडीने पुणेकर हैराण झाले. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील.