पुणे -धरण क्षेत्र, अतिदुर्गम भाग आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पानशेत येथे जिल्हा परिषदेची पहिली क्लस्टर स्कूल अर्थात मध्यवर्ती समूह शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. कमी पटाच्या शाळा बंद नव्हे, तर त्यांचे एकत्रीकरण करायचे, या नव्या पर्यायातून राज्यातील पहिलाच मध्यवर्ती समूह शाळेचा पथदर्शी प्रकल्प आहे.
पानशेतच्या परिसरातील किमान 20 च्या आत पटसंख्या असलेल्या सोळा जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळेसाठी पानशेतमध्ये मोठी इमारत उभारण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त मुलांसोबत शिक्षण घेण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठीही मदत होणार आहे. सध्या या शाळांमधील पटसंख्या खुपच कमी असल्याने दोन शिक्षकांच्या नियुक्तीवर शाळा चालवली जाते. परिणामी एकाच वर्गखोलीत विविध वर्गातील विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत आहेत.
पानशेतमध्ये उभारण्यात आलेल्या या क्लस्टर स्कूलमध्ये मात्र आता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गातील विद्यार्थ्यांसोबत बसून शिक्षण घेता येणार आहे. सध्या या 16 शाळांमध्ये मिळून एकूण 37 शिक्षक कार्यरत आहेत. शाळा एकत्रीकरणातून आता केवळ 9 शिक्षकांची गरज भासणार आहे. परंतु विविध विषयांचे तज्ज्ञ असलेल्या 12 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बसची सोय उपलब्ध करून देणारी ही राज्यातील एकमेव शाळा असणार आहे.
क्लस्टर स्कूलसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 प्रशस्त वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक वर्गात संगणक, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रयोगशाळा व एक ई-वर्गखोली तयार कऱण्यात आलेली आहे. इमारतीत आणखी चार खोल्या असणार आहेत. अशी एकूण बारा वर्गखोल्यांची ही नवी शाळा आहे. शाळेच्या इमारत बांधण्यासाठी जानकीदेवी बजाज फाउंडेशनने सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
कुरण बुद्रुक, वरचीवाडी, मधलीवाडी, वरसगाव, देशमुखवाडी, पडाळवाडी, सुतारवाडी, कुरण खुर्द, कादवे, शिर्केवाडी, चिमकोडी, वडघर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या गावामधील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी झेडपीने ही मध्यवर्ती समूह शाळेचा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे. ही शाळा जूनमध्ये होणार असून, या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी