कोल्हार – सध्या स्वच्छता हा विषय संपूर्ण राज्यभरात सक्रिय आहे. यामध्ये अनेक पारितोषिके मिळवणारी गावे स्वच्छतेसाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून काम करत असताना अनेक मंडळी दिसत आहेत. मात्र, राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दमध्ये याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथे अनेक ठिकाणी स्वच्छतेसाठी ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या मोकळ्या पडल्या असून, कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसत आहे. कचरा उचलण्यासाठी गेल्या वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आलेली कचरागाडीच आज कचऱ्यात पडलेली दिसत आहे. याकडे स्थानिक पदाधीकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, जिरवाजिरवीत ही मंडळी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द हे गाव राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. या गावातील राजकारण आणि त्यामुळे गावात विकासकामांत येत असलेले अडथळे हे सर्वश्रुत आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या गावकऱ्यांच्या अनुभवास येत आहे, याचे प्रमुख कारण असे की, गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावठाण हद्द, रोहिदास नगर, भोसले नगर, दत्त नगर, रेणुका नगर आदी परिसरात असलेल्या नागरिकांना घरातील कचरा टाकण्यासाठी गावात जागा उपलब्ध नसल्याने वरील सर्व ठिकाणी कचराकुंड्या बसविण्यात आल्या.
मात्र, याठिकाणी पडत असलेला सर्व कचरा वाहून नेण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने हा कचरा कचराकुंडीजवळच अस्ताव्यस्त पडलेला असायचा. त्यामुळे वर्षभरापूर्वी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कचरागाडी घेण्यात आली. यामुळे गावात अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल, अशी प्रामाणिक मानसिकता नागरिकांची होती. मात्र, झाले उलटेच!
लाखो रुपये खर्च करून विकत घेतलेली कचरागाडी लोकार्पण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठे फोटोसेशन केले. मात्र, कचरागाडीच सध्या धूळ खात पडली असून, लाखो रुपयांची विनाकारण नासाडी झाल्याचे दिसून येत आहे. गावात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यासंदर्भात अनेक ग्रामस्थ आवाज उठवत आहेत. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. परिणामी साथरोगाची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे कचरा गाडी लवकर सुरू करावी.