रणजित सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तकाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या कॉंग्रेसविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सावरकरांची बदनामी करणाऱ्या कॉंग्रेस पक्ष आणि नेते राहुल गांधी यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सावरकराचे नातू रणजित सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो असता उद्धव ठाकरे यांची भेट मिळाली नसल्याचे सावरकर यांनी सांगितले.
भोपाळ येथील कॉंग्रेस सेवादलाच्या शिबिरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरील चिखलफेक करणारी देशाचे “वीर सुपूत्र’ पुस्तिका वाटण्यात आली आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख देशाचे “वीर सुपूत्र’ असा केला होता. मात्र आता त्यांचेच वारसदार व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सावरकरांची बदनामी करत आहेत.
सावरकर हे काही कोणत्या पक्षाचे नव्हते, तर देशाचे होते. त्यांचा सातत्याने होणारा अवमान हा केवळ सावरकर कुटुंबियांचा नाही तर देशाचा आहे. लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जोडयाने मारायला हवे, अशी टिका केली होती. आता ती कृती करण्याची वेळ आली असल्याचे रणजित सावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आता या प्रकरणी राज्यसरकारने निर्णय घ्यावा. जर सरकारने न्याय दिला नाही तर आपण स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानाची लढाई रस्त्यावर उतरून लढणार असल्याचेही रणजित सावरकर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ ठरविण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने थेट मंत्रालयात आलो. ते मला किमान एक मिनिट तरी देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी वेळ दिला नसल्याचे रणजित सावरकर म्हणाले.
“त्या’ पुस्तिकेवर बंदी घाला – आशिष शेलार
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान व बदनामी करणाऱ्या कॉंग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात ही पुस्तिका वितरित होऊ नये यासाठी त्यावर तातडीने महाराष्ट्र सरकारने बंदी आणावी. तसा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हिंदूस्थानला नष्ट करण्याचा विडा उचलून आलेल्या अफझल खाना प्रमाणेच कॉंग्रेस हा देशातील देशभक्तांच्या प्रतिकांवर हल्ले चढवत तर नाही ना? अशी भिती आता निर्माण होते आहे. कॉंग्रेसच्या या पाकिस्तानी वृत्तीचा निषेध करून त्याविरोधात कडवा संघर्षही करू असा इशाराही आशिष शेलार दिला आहे.