वाहन उद्योगावरील मंदीचे सावट गडद
मुंबई : महाराष्ट्रात सरलेल्या वर्षात (2019) नव्या वाहनांच्या नोंदणीत तब्बल 15 टक्के घट झाली. परिणामी, राज्य रस्ते परिवहन विभागाला कमी महसूल मिळाला. त्यातून वाहन उद्योगावरील मंदीचे सावट गडद बनल्याचे संकेत मिळत आहेत.
देशातील मोठ्या वाहन बाजारांमध्ये समावेश होणाऱ्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या परिवहन विभागाने उपलब्ध केलेली आकडेवारी वाहन उद्योगाची चिंता वाढवणारी आहे. परिवहन विभागाने स्वत:हूनच 2019-20 या आर्थिक वर्षात अपेक्षित असलेल्या महसुलाचे उद्दिष्ट घटवले.
मात्र, नोव्हेंबरपर्यंतची स्थिती पाहता कमी करण्यात आलेले उद्दिष्ट गाठणेही अवघड असल्याचे स्पष्ट होत आहे. परिवहन विभागाला 2018-19 या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीशी निगडीत करांमधून 8 हजार 672 कोटी रूपये मिळाले. पुढील आर्थिक वर्षासाठी महसुलाचे उद्दिष्ट 8 हजार 249 कोटी रूपये इतके ठेवण्यात आले. मात्र, नोव्हेंबरपर्यंत त्या विभागाला केवळ 5 हजार 466 कोटी रूपये महसूल मिळाला आहे.
राज्यात 2018 या कॅलेंडर वर्षात 27.14 लाख इतक्या नव्या वाहनांची नोंदणी झाली. मात्र, गत कॅलेंडर वर्षात 23.10 लाख नव्या वाहनांचीच नोंदणी झाली. राज्यात 2018 मध्ये 19.69 लाख दुचाकी, 3.97 लाख चारचाकी आणि 1.72 लाख तीनचाकींची नोंदणी झाली. मात्र, मागील वर्षी तिन्ही प्रकारच्या वाहन नोंदणीत घट नोंदली गेली. ते प्रमाण अनुक्रमे 16.92 लाख, 3.66 लाख आणि 95 हजार 808 इतके राहिले.
राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या विभागांपैकी एक म्हणून परिवहनकडे पाहिले जाते. त्या विभागाने 2015 या आर्थिक वर्षापासून ठरवलेले महसुलाचे उद्दिष्ट ओलांडले. मात्र, त्याला चालू आर्थिक वर्षात ब्रेक लागला. आता आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने मजल मारण्याची आशा परिवहन विभागाला वाटत आहे.