नगर -करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या वैष्विक महामारीच्या संकटकाळात पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीत विवाह सोहळा करावा, अशी तंबीच राज्य सरकराने दिली आहे. सध्याच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या या नियमाचे कायमस्वरुपी कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात दहातोंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन पाठविले आहे.
संकटकाळाची गरज म्हणून सध्या हा नियम करण्यात आला आहे. लोक त्याची अंमलबजवणीही करत आहेत. भव्यदिव्य लग्न सोहळ्यांना सध्या आळाच बसला. अलिकडे लग्नसोहळे म्हणजे एक जीवघेणी प्रथाच रूढ झाली आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी ऐपत नसतांना लोक भरमसाठ खर्च करतात. लग्नपत्रिका छपाई त्यात नाव टाकण्यावरून मान-पान, घरी येऊन पत्रिका दिली नाही म्हणून रुसवे-फुगवे, हजारो लोकांच्या जेवणावळी, नातेवाईकांना मान-पान, त्यांची रुसवा-फुगवी, पुढाऱ्यांचे सत्कार, त्यांचे आशिर्वाद, वरमाईचा थाट, आदी अनावश्यक गोष्टीवर लाखो रुपये खर्च होतो. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते वारेमाफ खर्च होतो असे दहातोंडे म्हणाले.
…तो निधी सामुदायिक विवाहासाठी वापरावा
ज्या लोकांना पन्नासहून अधिक लोक लग्नासाठी आणायचे असतील त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडून तशी परवानगी घ्यावी. पन्नासहून अधिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी किमान एक हजार रुपये शुल्क आकारणी करण्यात यावी. ही रक्कम दरवर्षी जिल्हास्तरावर शासनाने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून त्यासाठी खर्च करावी, असा प्रस्ताव दहातोंडे यांनी सरकारला सुचविला आहे.