मुंबई – विविध मागण्यासाठी दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्या वतीने लाठीचार्ज करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर मोदी सरकार अश्रुधुराचा मारा करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. देशातील शेतकरी हे सगळे बघत असून या अश्रुधुरांचा परतावा ते केंद्र सरकारला व्याजासह देतील, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे आणि मोदी सरकार त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा करत आहे. १० वर्ष शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने काही केले नाही आणि आता शेतकरी आपला हक्क घेण्यासाठी रस्त्यावर उतरून मागणी करत असल्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे.
एकीकडे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देणार असल्याची घोषणा आमचे नेते राहुलजी गांधी यांनी केली आहे, तर दुसरीकडे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना लाठ्या काठ्या देणारे केंद्रातील मोदी सरकार आहे, असेही ते पुढे म्हणाले.