नवी दिल्ली – शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी शेतकरी मोठया प्रमाणात राजधानीकडे येत आहेत. मात्र सरकारने चर्चा करून तोडगा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
पंजाब ते दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला आहे. १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकले नाही.
शेतकरी आंदोलनामुळे सुरक्षा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. अशातच शंभू बॉर्डरवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात चकमक झाली. पोलीस शेतकऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शेतकरी थांबायला तयार नाहीत. त्यांनी पुलावरील लोखंडी कठडे ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून अश्रू धुराचा मारा केला. यामुळे परिस्थिती चिघळली आहे.
किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंग पंढेर म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही. त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे. त्यांना फक्त वेळ घालवायचा असतो. सरकारच्या प्रस्तावावर आम्ही विचार करू, मात्र आंदोलनावर ठाम राहू.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, सर्व काही चर्चेने सोडवले पाहिजे. काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
हरियाणातील ७ आणि राजस्थानच्या 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद आहे. 15 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. हरियाणाची सिंघू-टिकरी सीमा आणि दिल्ली आणि यूपीची गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे.
दिल्लीतही कडक बंदोबस्त आहे. येथे एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. गर्दी जमवण्यास आणि ट्रॅक्टरच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
सोनीपतच्या कुंडली-सिंघु सीमेवर राष्ट्रीय महामार्ग-44 मार्गे दिल्लीत वाहनांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. लहान-मोठी सर्व वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येत आहेत. पोलिस ड्रोनच्या साह्याने नजर ठेवत आहेत.