श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आज साखर 3 हजार 500 रुपये प्रति क्विंटल असून शेतकऱ्यांच्या उसाला 2 हजार 700 प्रति टन ऊस दिला जात आहे. उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असतानाही अशोक कारखाना 15 जानेवारीपासूनचे ऊस पेमेंट करण्यास असमर्थ ठरत आहे.
चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनामुळे अशोक कारखाना अडचणीत आला असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे. व्यवस्थापनाने 30 एप्रि च्या आत गाळप झालेल्या संपूर्ण उसाचे एफआरपी पेमेंट त्वरित अदा करावे, अन्यथा शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल,असा इशाराही त्यांनी दिला.
औताडे पुढे म्हणाले की,अशोक सहकारी साखर कारखान्याची गाळप हंगाम 2023- 24 ची सांगता कारखान्याचे अध्यक्ष मा. आ.भानुदास मुरकुटे यांनी केली.अशोक कारखाना हा गेली 40 वर्षापासून ऊस उत्पादक सभासदांनी विश्वास ठेवल्यामुळे एकहाती सत्ता मुरकुटे यांच्याकडे दिली. मुरकुटे यांनी सातत्याने अशोक शेजारील गणेश व डॉ.तनपुरे कारखान्या चे उदाहरणे देऊन सभासदांना खोटी भीती दाखवत अशोक कारखान्याची खरी आर्थिक वस्तुस्थिती समोर येऊ दिली नाही.
संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कारखान्याच्या आर्थिक व्यवहाराची पोलखोल केली. सन 2009-10 मध्ये साखरेचे दर 2200 क्विंटल असताना अशोक कारखान्याने 2 हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला. त्यावेळी कारखान्याकडे कोजन इथेनॉल असे कुठलेही उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प नव्हते.
आज प्रकल्प असतानाही कारखान्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट होते की नाही अशी परिस्थिती उपस्थित झाली आहे. आज रोजी अशोक सहकारी साखर कारखान्यावर 400 कोटी मध्यम मुदत कर्ज व 135 कोटी पूर्व हंगामी कर्ज असे 535 कोटी रुपये एकूण कर्ज झाले आहे.
या कर्जापैकी 100 कोटी कर्ज जिल्हा बँकेने वसूल केले आहे. कर्जाबाबत अशोक संचालक मंडळ सभासदांपुढे वस्तुस्थिती मांडताना दिसत नसून केंद्राच्या धोरणावर व साखरेच्या दरावर बोट दाखवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करत आहे. त्यांच्याकडून कारखान्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती वाचविण्यासाठी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची जिल्हा बँकेची असलेली कर्ज वसुली सक्तीने केली आहे. या धोरणाबाबतही अशोकच्या व्यवस्थापनाचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
अशोक कारखान्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या या गंभीर आर्थिक परिस्थितीची पोलखोल करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे.याबाबत शेतकरी संघटना शासन स्तरावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असून न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप.
सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल,डॉ. दादासाहेब आदित, डॉ. विकास नवले , शरद असणे , गोविंद वाघ, शरद पवार, प्रभाकर कांबळे, राजेंद्र कोकने, विष्णुपंत खंडागळे, बंडू पाटील पटारे , दिलीप औताडे, शैलेश वमने ,शिवाजी ताके ,सतीश नाईक, तुषार ताके, दत्ता जानराव, शिवाजी दांगट, प्रभाकर पटारे ,सुभाष पटारे, इंद्रभान चोरमल, कडू पवार आदींनी दिला.