नवी दिल्ली – कोणत्याही प्रकारच्या प्रेमप्रकरणात प्रेमभंग होणे, हार्टब्रेक होणे किंवा दिल टूट जाना हे अपेक्षितच असते. ते टाळता कसे येऊ शकेल? जर एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला त्यांच्या पालकांनी विशिष्ट व्यक्तीशी विवाह करण्याची सूचना केली असेल, तर ती गोष्ट कायद्याच्या दृष्टीने गुन्हा होऊ शकत नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रेमप्रकरणांत गुंतलेल्या तरुणाईला व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर सल्ला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. विक्रम नाथ आणि न्या. केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर एक विचित्र गुलाबी प्रकरण सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात विजय आणि वनिता (नावे काल्पनिक) यांच्या प्रेमाची कहाणी आहे. किमान दोन ते तीन वर्षे विजय आणि वनितामधील प्रेमप्रकरण सुरु राहिल्यानंतर विवाहाबाबत निर्णय घ्यायची वेळ आली. त्यावेळी विजयने आपण वनिताशी विवाह करु शकत नसल्याचे वनिताला सांगितले. यावेळी त्याने वनिताला तिचे आई-वडील सांगतील त्याच्याशी विवाहाचा सल्ला दिला.
हे ऐकून वनिताचा अपेक्षाभंग अर्थात हृदयभंग झाला. तिने विजयला विवाहासाठी वारंवार याचना केली. मात्र, आपण तिच्याशी विवाह करण्याअस समर्थ असल्याचे विजयने सांगितल्याने वनिताने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्त्या केली. एका प्रेमकहाणीचा असा करुण अंत झाल्याने, वनिताच्या पालकांनी विजयविरुद्ध थेट न्यायालयात दाद मागितली आणि कलम ३०६ अंतर्गत त्याच्यावर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.
त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. नाथ आणि न्या. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, असे प्रमभंग हा रोजच्या जीवनाचा भाग आहे. प्रेयसीला तिच्या पालकांच्या इच्छेनुसारच लग्न करण्याचा सल्ला देणे, म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे. आत्महत्येस प्रवृत्त करणारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृती असावी लागते. कलम ३०६ अंतर्गत हा गुन्हा घडलेला नाही.
खंडपीठाने आरोप आणि कायद्याचा विचार केल्यानंतर अपीलकर्त्याची कोणतीही सक्रिय भूमिका नसल्याचे सांगितले. आरोपीने बोललेले शब्द परिणामांचे सूचक असले पाहिजेत. याप्रकरणी विजयच्या कुटुंबीयांनी वधूचा शोध सुरू केल्याने पीडित मुलगी वनिता अस्वस्थ झाली होती.
त्यानंतर पोलिसांनी विजयविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाने विजयविरुद्धचा खटला फेटाळण्यास नकार दिला. त्यावर विजयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणात वनिताने आत्महत्या केली जेव्हा तिचा प्रियकर विजयने तिला तिच्या पालकांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचा सल्ला दिला. तो स्वतःही तेच करत होता. अशा केसेसमध्ये तुटलेली नाती आणि प्रेमभंग हे दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. मात्र, याला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही.