नवी दिल्ली – केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारे आपले आंदोलन नवव्या दिवशी सुरूच ठेवले. हे कायदे रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे.
बाजार समित्या आणि खासगी बाजारपेठे संदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करण्याचे संकेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. बाजार समित्यांचे संरक्षण करण्यास सरकार कटीबध्द आहे. बाजारपेठमुक्त वातावरण, व्यापाऱ्यांची नोंदणी यामुळे यामुळे बाजार समितीत आणि बाहेरही समान परिस्थिती राहील, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नेत्यांनी या चर्चेतून किंचितशी प्रगती झाली असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांच्यात बैठकीची पुढची फेरी उद्या होणार आहे. विज्ञानभवनमध्ये काल चर्चेची चौथी फेरी पार पडली. मात्र या चर्चेतून कोंडी फुटली नाही. शेतकऱ्यांची निदर्शने कडाक्याच्या थंडीतही नवव्या दिवशी सुरूच राहिली.
दल्लीच्या सीमांवर केवळ ठिय्या दिला आहे, असे नव्हे तर दिल्ली-गाझियाबाद रस्त्यावर आपल्या जनावरांसहीत शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहे.उत्तर प्रदेशात जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ शेतकऱ्यांनी रोखला आहे. सिंगू, टिकरी, चिल्ला आणि गझियापूर सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवचण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. आठवररून भोप्रा, अप्सरा सीमेकडील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुकरबा, जीटीके रस्तायावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. टिकरी आणि झरोदा सीमेवर वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बदुसराई सीमेवर केवळ मोटारी आणि दुचाकी स्वारांना प्रवेश देण्यात येत आहे. हरियाणात जाण्यासाठी दिल्लीकरांना धनसा, दौराळा, कपाशेरा रजोक्री असा वळसा घालावा लागत आहे. गौतमबुध्द् प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिय्या दिल्याने नोएडा बाह्य वळण मार्गावर वाहतूक थांबवण्यात आली आहे.
गुडगाव आणि झज्जर- बहादूरगढ या मार्गावरील वाहतूकही पोलिसांनी रोखून धरली आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीच कोंडी झाली आहे. त्यामुळे सिंघू आणि टिकरीसह शहरातील पाचही प्रवेशाचे प्रमुख मार्ग निदर्शनांमुळे बंद आहेत.