Farmer turned tractor on farm : यंदा झालेला कमी पाऊस त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळे सर्वात जास्त नुकसान राज्यातील बळीराजाचे झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यानंतर राहिलेल्या मालाला आता बाजारात योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा माल बाजारात आला की दर कोसळतात आणि घातलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे कष्टाने उभ्या केलेल्या बागेवर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवल्याचे घटना घडली आहे.
वारे वडगाव येथील शेतकरी देवेंद्र डिसले यांनी सव्वा एकर पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे. लाखो रुपये खर्चून बाग जोपासली पण ऐन भरात असताना पपईचे बाजारभाव कोसळले आणि यात डिसले यांचे मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र डिसले यांनी सव्वा एकर पपईची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना जवळपास एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला. पपईची चांगली जोपासना केली. वेळेवर फवारण्या केल्या. खतांच्या मात्रा दिल्या. त्यामुळे पपईच्या झाडाची चांगली वाढही झाली.
एका झाडाला 60 ते 70 किलो भरतील इतक्या पपया लगडल्या. परंतु 25 रुपये किलो विक्री होणारी पपई एक ते दोन रुपये किलो दराने विक्री होऊ लागली. त्यामुळे हवालदील झालेल्या देवेंद्र डिसले यांनी पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला. पपईसाठी लाखापेक्षा जास्त खर्च झाला. सध्या पपईचे बाजार भाव पडले आहेत. पपईला एक ते दोन रुपये किलोचा बाजार भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांना बोलूनही प्रतिसाद मिळत नाही.
स्वत: पपई काढून बाजारात नेली तर वाहतूक खर्चही निघाला नाही. हाती रुपयाही लागला नाही उलट वाहतूक खर्च देण्याची वेळ आली. त्यामुळे बागेवर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे डिसले यांनी म्हटले. शेतीसाठी एक लाखाचं पीक कर्ज घेतले होते. बँकेचा त्यासाठी तगादा सुरू आहे. मात्र, पपईची बाग फेल गेल्यानं पैसे कुठून भरायचे याची चिंता आहे. त्यात पुन्हा मशागतीचा खर्च करावा लागणार आहे. नव्या पिकासाठी बाग मोडली. यात काही परवडलं नाही. सरकारने शेतकऱ्याकडं लक्ष द्यावं, असे डिसले यांनी यावेळी सांगितले.