रांजणी – चक्रीवादळामुळे पॉलीहाऊसधारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांची पॉलीहाऊस शेतात चांगल्या स्थितीत होती, अशा शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस व शेडनेटचे सुमारे 40 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने नुकतीच घेतली. त्यातुन पॉलीहाऊस व शेडनेटधारकांचे नुकसानही अधोरेखित झाले आहे. या संदर्भात ज्या पॉलीहाऊस धारकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पॉलीहाऊसचे पंचनामे देखील सुरू झाले आहेत.
परंतु जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागाचे अद्यापही पंचनामे सुरू झाले नाहीत. खरे तर करोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतपिकाला कवडीमोल बाजारभाव मिळाला. अशातच निसर्ग चक्रीवादळाचा फटका शेतकऱ्यांना बसला.
झालेल्या चक्रीवादळात ग्रामीण भागात तर शेतकऱ्यांची घरे देखील जमीनदोस्त झाली. तर बहुतांश पिकाबरोबरच शेतीचेही अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात विशेषत: जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ या तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात पॉलीहाऊस व शेडनेटमध्ये फुले आणि फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
शेडनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळत असल्याने गेल्या काही वर्षात पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये शेतपिकांबरोबरच फुलांचे उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच चक्रीवादळामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात पॉलीहाऊस आणि शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पॉलीहाऊसधारक शेतकरी बाळासाहेब भुजबळ म्हणाले की, खरे तर शासनाने पॉलीहाऊस आणि शेडनेट धारक शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेताची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आधार देण्याची गरज आहे.
विशेषत: शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची त्याचबरोबर पॉलीहाऊस आणि शेडनेटची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
87 गावांतील 317 जणांना फटका
आंबेगाव तालुक्यात आठ गावातील सुमारे 22, खेड तालुक्यात 3 गावांमध्ये 4, शिरुर तालुक्यातील 13 गावातील 14 तर मावळ तालुक्यात 26 गावातील 137 पॉलीहाऊस आणि शेडनेट धारक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील सुमारे 87 गावांतील 317 शेतकऱ्यांच्या पॉलीहाऊस आणि शेडनेटचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भातील माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.