सातारा (प्रतिनिधी) – करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा, नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत इतर आजारांनी डोके वर काढू नये म्हणून प्रत्येकानेच आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. सचिन पाटील यांनी केले.
डॉ. पाटील म्हणाले, लवकरच पावसाळा सुरू होत आहे. सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडणार आहे असे अनुमान आहे. या पार्श्वभूमीवर जलजन्य, किटकजन्य आजार डोके वर काढू शकतात.आरोग्य खात्यातर्फे 86 पथके जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यरत असणार आहेत. तथापि; नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. विषाणूची भीती आणि हे आजार असा एकत्रित संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. कोठेही पाणी साठु देऊ नये, स्वच्छता ठेवावी.
कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. आरोग्य यंत्रणेमार्फत साथ नियंत्रण पथके कार्यरत असणार आहेत. तथापि नागरिकांनी वैयक्तिक सामाजिक आणि गावाच्या पातळीवर स्वच्छता ठेवून आणि आरोग्य विषयक नियम पाळून हे आजार उद्भवू नयेत, अशी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे.