इंदोरी – मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण ते वराळे इंद्रायणी नदीवर पूल नाही. गेल्या तीन पिढ्यांपासून या गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून इंद्रायणीच्या नदीपात्रातून मोडकळीस आलेल्या होडीतून प्रवास करावा लागतो आहे. ही होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारा दुवा आहे.
नाणोली तर्फे चाकण गावची लोकसंख्या पंधराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी ग्रामस्थांना जवळचा मार्ग म्हणून होडीने प्रवास करावा लागतो. येथील विद्यार्थीही वराळे व इतर गावातील शाळेत जाण्यासाठी याच होडीचा वापर करतात. विशेष म्हणजे महिला नावाडी ही होडी ओढीत आहे. वादळी वारा असो की मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी किंवा रणरणते ऊन याची पर्वा न करता ती महिला कुटुंबीयांसाठी राबत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळवून देणाऱ्या तळेगाव औद्योगिक वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वराळे ते नाणोली तर्फे चाकण गावांना होडीच्या माध्यमातून नावाडी म्हणून जोडण्याचे काम ही माऊली करीत आहे.
गेल्या 30 वर्षांपासून बेबीताई गव्हाणे ही ज्येष्ठ महिला नावाड्याचे काम करत आहे. दोन्ही गावाला दळण वळणाचे साधन नसल्याने त्यांना नदीतून होडीच्या साह्याने जावे लागते. जीव मुठीत घालून प्रवाशांसह ती रोज नौकेतून प्रवास करीत आहे. पावसाळ्यात नदीतील पाण्याला वेग असल्याने होडी चालविताना चालकाला कसरत करावी लागते.
सरकारला जाग कधी येणार?
येथील इंद्रायणी नदीवर पूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी 50 वर्षांपूर्वीपासून ग्रामस्थ करीत आहेत. आजही त्यांची ही मागणी कायम आहे. 1985मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी पुलाच्या कामाचे भूमिपूजनही केले होते. परंतु, अद्याप पूल झाला नाही. पावसाळा सुरू झाल्यावर इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहते. तेव्हा देखील ग्रामस्थांना याच होडीतून प्रवास करावा लागतो.
पुलाचा निधी कुठे गेला वाहून?
काही वर्षांपूर्वी सहा कोटी रुपये खर्चून या ठिकाणी पूल बांधायची घोषणा शासनाने केली होती. परंतु ती घोषणा इंद्रायणीच्या प्रहावात वाहून गेली. केंद्र आणि राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाची घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात आजही दळणवळणाची साधनेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे भारत खरच विकसित होतो का, असा प्रश्न नाणोलीतील नागरिक विचारत आहेत.
तीन पिढ्यांपासून माझे कुटुंब होडीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत आहे. आम्ही नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. या मोबदल्यात पैसे न घेता आम्ही शेतकऱ्यांकडुन थोडेफार धान्य घेतो. धोकादायक वाहतूक करत असताना आम्हाला कुठलाही विमा नाही. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे. सध्या महागाईचे दिवस असल्याने सरकार किंवा दोन्ही ग्रामपंचायतींनी आम्हाला मानधन द्यावे.
– बिबाबाई गव्हाणे, नावाडी महिला-नानोली