हिंजवडी – आयटीनगरी हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने आयटीतील जनजीवन विस्कळीत झाले. आयटीनगरीतील वाहतुकीचा फज्जा उडाला. तब्बल चार तास आयटीयन्स वाहतूक कोंडीत अडकले होते.
नेहमीच चर्चेत असलेली आयटीतील वाहतुकीची रात्री उशिरापर्यंत वाताहत झाली होती. मंगळवारी (दि. 30) रोजी दुपारी दोनच्या सुमारास या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन तास पाऊस पडत होता. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मेट्रोची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांवर पाणी वाहत होते. तर त्यामुळे सखल ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठून रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते. परिणामी आयटी कंपनीतून सुटलेल्या कर्मचाऱ्यांनी गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यातून बाहेर पडण्यासाठी वाहनचालकांना तब्बल तीन ते चार तास वाट पाहवी लागली.
तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित
दुपारी दीड वाजताच्या सुमारास हिंजवडी आणि माण येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी मुख्य वीजवाहिनी खंडित झाली असल्याने तब्बल सहा तास “बत्ती गुल’ झाली होती. अखेर सायंकाळी आठच्या सुमारास वीजप्रवाह पूर्ववत सुरळीत झाला.
अग्निशामकच्या जवानांनी रस्ता केला मोकळा
आयटी कंपन्या असलेल्या फेज 2 मध्ये विप्रो सर्कल येथे मारुंजी येथील डोंगर माथ्याहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यामुळे उतार असलेल्या रस्त्यावर सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. परिणामी हिंजवडीकडे येणारी वाहतूक अतिशय संथ गतीने होत होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली असल्याने देखील वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे अखेर एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दूर करत वाहतूक सुरळीत केली.
चार किलोमीटर वाहनांच्या रांगा
माण येथील फेज 3 जवळील “सिट्रोईन’ आयटी पार्क ते वाकडपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने आयटी ठप्प झाल्याचे चित्र दिसत होते. तर माण गावातून जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने घोटवडे, पिरंगुटकडे जाणाऱ्या वाहनांच्या बापूजीबुवापर्यंत रांगा लागल्या होत्या. माण गाव ते हिंजवडी आशा तब्बल चार किलोमीटरवर ट्रॅफीक जाम झाले होते.