मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हिंदू मंदिरांबाबत केले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “मला वाटते की आपला देश असा आहे की, विशेषत: हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही.
तेथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. मी लंडन आणि इटलीसह परदेशात अनेक देशांमध्ये गेलो. येथील गुरुद्वारा, मशीद आणि चर्चचे वातावरण पाहून मला वाटले की, आपली प्रार्थनास्थळेही अशीच असावीत. मला संधी मिळताच मी महाराष्ट्रातील देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींची मान्यता दिली. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही करतो आहोत.” असे गडकरी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे सांगितले की, ‘आम्ही उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून सुरू होणाऱ्या कैलास मानसरोवर मार्गाचे 80 ते 85 टक्के काम केले आहे. पूर्वी नेपाळमधून जावे लागे आणि या दरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा.’ असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गडकरी यांनी 31 मे ला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.