मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडीनंतर शिंदे गट आणि भाजप यांचे एकत्र सरकार स्थापन झाले. या घटनेला आता एक महिना उलटत आहे. मात्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला तारीख पे तारीखच मिळत असल्याचे दिसत आहे. नेमक्या याच मुद्द्यावरून राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांनी त्यांच्या शैलीत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. अजित पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी “एक महिना झाला तरी यांना मंत्रीमंडळाच्या विस्तार करण्यासाठी मुहूर्त मिळेना? का ग्रीन सिग्नल मिळत नाही? एकवाक्यता का होत नाही? कि मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची भीती आहे? अशी विचारणा केली आहे. राज्यातील 13 कोटी जनता आशेने बघत आहे. अनेकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सचिवांशी बोललो तर ते म्हणतात मंत्री महोदयांच्या रिमार्कची गरज आहे. त्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. त्यामुळं आता कसा कारभार चाललाय ते जनतेन पाहावं असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असे सांगत त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे.
राज्यकर्ते बदलत असतात. नवीन येत असतात जुने जात असतात. कोणीही सरकारमध्ये आलं तरी कायदा, संविधान नियम याच्या अधिन राहून काम केलं पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. अतिवृष्टीनं शेतीचं, घराचं, रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी असे अजित पवार म्हणाले. ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण दरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्यात घेतलं जातं. आता ऑगस्ट महिना सुरु झाला असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. एक महिना झाला तरी मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्यातल पूरग्रस्त भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी गोगलगायीचा प्रादुर्भाव होत आहे. पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झाली आहे. घरे, रस्ते, यांचे देखील नुकसान झालं आहे. पुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुलं नुकान झालेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना आधार देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.