पुणे : लॉकडाऊनमुळे घरमालक आणि भाडेकरु विद्यार्थी यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. अनेक महिन्यांचे भाडे थकल्याने घरमालक हवालदिल झाले होते. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये गावाकडे गेल्याने विद्यार्थी पुर्ण महिन्यांचे भाडे देण्यास नकार देत होते. काही घरमालकांनी स्वत:हून सवलत देत वाद मिटवले. तर दुसरीकडे घरमालकाची हतबलता लक्षात घेत विद्यार्थ्यांनीही सहकार्याची भूमिका घेतली. मात्र अनेक प्रकरणांत दोघेही आपापल्या मतावर ठाम असल्याने वाद पोलिस स्टेशनपर्यंत जाण्याची भाषा सुरु झाली होती. मात्र या घरमालक व भाडेकरु या दोघांमधला दुवा असलेल्या इस्टेट एजंटांनी मौलाची भूमिका बजावत परस्पर सामंजस्याने अनेक वाद मिटविण्यास सुरवात केली आहे. यामुळे पोलिस ठाण्यापर्यंत हे वाद जाण्याची वेळ आली नाही.
यासंदर्भात बोलताना इस्टेट एजंट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले, वैश्विक महामारी कोविड 19 ने सर्व जगाच्या मानसिक आणि व्यावहारिक विचाराच्या व्याख्या बदलल्या असून राजा पासून रका पर्यत सर्व ह्या फेऱ्यात अडकले आहे त्यात भाडेकरी आणि घरमालक हा आज चा कळीचा मुद्दा बनला आहे. एकट्या पुणे शहरात अंदाजे दीड लाख विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि जवळपास पाऊण लाख सदनिका भाडेतत्वावर दिल्या जातात.
सदनिका मालकांपैकी काहींनी कर्ज काढून तर काहींनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या शिलकेतून सदनिका विकत घेतल्या आहेत. या सदनिका भाडेतत्वावर देऊन त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. तर काहींच्या बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी सदनिकेचे येणारे भाडे हे उत्त्पन्नाचे साधन झाले आहे. तर दुसरीकडे अनंत स्वप्न उराशी बाळगून देशभरातून विद्येच्या माहेरघरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी.
पुणे विद्यापीठाबरोबर सिम्बायोसिस, भारती विद्यापीठ, एमआयटी सारखी डीम्ड विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात. येणारे 55% टक्के विद्यार्थी अगदी प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात येतात. तसेच स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनेक क्लास पुण्यात आहेत. क्लास केल्यानंतर अभ्यासिका. आणि मग उरलेला वेळ रूम वर. अनेक विद्यार्थी सकाळी 5 रु चा चहा आणि 2 रु पार्ले चे बिस्कीट हाच नाश्ता उरकून क्लासला हजर राहत आहते. त्यानंतर भोजन शाळेत 30 ते 40 रु थाळी एक वेळ जेवण जेवून हे विद्यार्थी पीएसआय पासून कलेक्टर होण्यासाठी धडपडत असतात. यातील अनेकजण 4 ते 5 विद्यार्थ्यांमध्ये एक रूम शेअर करत असतात. अश्या परिस्थितीत दोन्ही बाजू नी एकमेकांचा विचार होणे आवश्यक आहे आणि तो होत आहे 70 % प्रकरण इस्टेट एजेन्ट्सनि सामोपचाराने मिटवली आहेत.