करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुलाबाळांच्या काळजीने मनात काहूर
पुणे – लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बहुतांश पालकांची दैनंदिन धावपळ (रुटीन) सुरू झाली आहे. अशा स्थितीत लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न पुढे येऊ लागल्याने पाळणाघरे सुरू व्हावीत, असे मत काही पालक व्यक्त करीत असले तरी रोजच्या रोज करोना बाधितांचा वाढता आकडा पाहून पाळणाघरात मुलांना कसे सोडणार? असा प्रश्न दुसऱ्या बाजूला पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. यातून द्विधा मन:स्थितीत पालकांच्या मनात काळजीने काहुर उठल्याचे पहायला मिळत आहे.
करोना संक्रमणामुळे बंद पडलेले सगळे व्यवहार सुरू करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकारतर्फे सुरू झाला आहे. त्यातून खासगी कार्यालयेही टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहेत, अशावेळी जेथे पती-पत्नी दोघेही “वर्किंग’ आहेत, त्यांना मुलांना कोठे ठेवावे, असा प्रश्न पडला आहे. नोकरी टिकवायची तर पाळणाघरे हवीतच, हे महत्त्वाचे असताना मुलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्नही पालकांना तितकाच महत्त्वाचा वाटतो आहे.
योग्य खबरदारी घेऊन पाळणाघरे सुरू करण्याला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील पाळणाघरे सुरू करण्याला तसेच प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरच्या पाळणाघरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील मुलांना येण्यालाही बंदी घालण्यात आली आहे.
पाळणाघरामध्ये सॅनिटायझेशन, मुलांचे सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्य गोष्टींचे पालन करावे लागणार आहे. मात्र, लहान मुलांमध्ये एवढी जागरूकता आणता येईल का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मुलेच ती…एकमेकांबरोबर खेळणार, भांडणार, जेवणार, अशा गोष्टी होणारच त्यामुळे पाळणाघर चालकांचा कस लागणार आहे.
पाळणाघर चालकांची तयारी…
एक जुलैपासून पाळणाघर सुरू करण्याची तयारी काही पाळणाघर चालकांनी केली आहे. त्यांनी पालकांची ऑनलाइन मिटींग घेतली आहे. त्यामध्ये पालकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचा विचार करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुलांची शक्य तेवढी काळजी घेण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे. तसेच एखादा पाल्य आजारी पडल्यास पालकांचीही त्याला पाळणाघरात न पाठवण्याची जबाबदारी असल्याचे चालकांनी सांगितले आहे.
पालकांचे मत…
सध्या तरी मुलांना पूर्णवेळ पाळणाघरात सोडण्याची पालकांची मानसिकता नाही; परंतु मुले घरात कंटाळली असल्याने खेळायला किमान दोन-तीन तास पाठवण्याची तयारी पालकांनी केली आहे. आठवड्यातून दोन दिवस काही तास खेळायला मुलांना पाठवू शकतो, असे मत अर्चना शाळीग्राम या पालक प्रतिनिधींनी व्यक्त केले.