मुंबई – विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला आलेल्या अपयशाचा धक्का पचतो न पचतो तोवरच शिवसेना व पर्यायाने मविआला मोठा धक्का बसला आहे. २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेली २५ वर्षांची युती तोडून वैचारिक मतभिन्नता असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. मात्र असे करताना पक्षातील लोकप्रतिनिधींचा एक मोठा गट पक्षनेतृत्वाच्या या निर्णयावर नाराज होता का? असा प्रश्न सोमवार मध्यरात्रीपासून उपस्थित होतोय.
शिवसेनेचे ठाण्याचे व संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचे शिलेदार म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड उभा केलं आहे. शिंदेंच्या या बंडाला थोड्या थोडक्या नव्हे तर ४० आमदारांचं बळ असल्याचं ते सांगतात. सोमवारी राज्यातील विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सुरत गाठली होती. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुजरात पोलिसांच्या कडेकोट संरक्षणात त्यांनी येथे डेरा मांडला होता. मंगळवारी सेनेकडून त्यांचं मन वळवण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील झाला.
अशातच मंगळवारी मध्यरात्री उशिरा शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सुरतेहून मुक्काम गुहाटीला हलवला आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिंदेंनी आपल्यासोबत ३५ नव्हे तर ४० आमदार असून आणखी १० येतील, आपल्याला बाळासाहेब व आनंद दिघेंच्या हिंदुत्वाच्या शिकवणीला पुढे घेऊन जायचं आहे असं सांगितलं. अर्थात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिंदुत्वापासून दूर चालली असल्याचा संदेश त्यांना यातून द्यायचा होता.
दरम्यान, सुरत येथे असताना एकनाथ शिंदे व शिवसेनेचे बंड पुकारलेले आमदार यांचा एक फोटो समोर आला होता. यामध्ये शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने सेना आमदार असल्याचं दिसतंय.