काल महाराष्ट्राचे राजकारण हादरवणारी घटना समोर आली. महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह थेट सुरतला गेल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता शिंदे हे आमदारांसह सुरतहुन थेट गुवाहाटीला गेल्याचे वृत्त हाती येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी काल सुरतमधील हॉटेलमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या चर्चेला फारसं यश मिळालं नाही. काल मध्यरात्री शिंदे यांनी सर्व आमदारांसोबत गुवाहाटीला प्रस्थान केलं आहे. तत्पूर्वी शिंदे यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरून बोलणं झालं होतं.
का करण्यात आलं एअरलिफ्ट ?
शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार चांगलचं अडचणीत आलं होतं. शिवसेनेकडून स्वतः मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्रातून येऊन शिंदेंशी चर्चा केली. त्यानंतरदेखील काही तोडगा निघू शकला नाही. अशात शिवसेनेकडून शिंदेंसह इतर आमदारांना पुन्हा संपर्क केला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी सर्व आमदारांना गुवाहाटीला एअरलिफ्ट करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
गुवाहाटीचं का ?
गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे तरीही शिंदे आणि आमदारांना गुवाहाटीला हलवण्यात आलं. याच महत्वाचं कारण म्हणजे गुवाहाटीमध्ये २०१६ पासून भाजपच राज्य आहे. विशेष म्हणजे या राज्यामध्ये गुजरातच्या मानाने इतर कोणत्याही पक्षाची ताकद फारशी नाही. त्यामुळे आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या टृष्टीने हा निर्णय घेण्यात आला अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला.अपक्ष आमदारांपैकी असलेले राज्य मंत्री बच्चू कडू हे देखील शिंदे यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे यांच्यासोबत ३३ आमदारांसह सात अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सरकार वाचवण्यासाठी शिवसेना आता शिंदे यांना कसा संपर्क करणार याकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.