नवी दिल्ली : देशासह जगभरात आज ‘ईद-उल-फित्र’ म्हणजेच ‘रमजान ईद’ साजरी केली जात आहे. देशभरातून एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व मुस्लिम बांधवाना त्यांच्या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. ‘हा सण आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढवेल. मी सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो ,” असे म्हटले.
त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी , ईद मुबारक! हा पवित्र सण प्रेमाचा भाव जागृत करणारा आणि आपणा सर्वांना बंधुभाव आणि सौहार्दाच्या बंधनात बांधून घेवो’, असे त्यांनी म्हटले आहे.
हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. करोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
महिनाभराच्या रमजाननंतर अखेर सोमवारी ईदचा चंद्र दिसला. चंद्र दिसताच लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि अभिनंदन केले. ईदचा चंद्र दिसल्याने सोमवारी शेवटची नमाज-ए-तरावीहची झाली. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर मशिदींमध्ये सुरू झालेल्या तरावीहच्या विशेष नमाजाची सांगता झाली. मौलाना आणि मौलवी यांनी ईदचा सण शांततेत आणि प्रेमाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.