मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलना मध्ये शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा त्यांनी जाहीर सभेमधून केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
त्यावर आता भाजपकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची फेसबुक पोस्ट
आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा ‘तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरून तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य नाही. हेही स्पष्ट झालंय. बाकी राम मंदिरासाठी भाजपानं आपली उत्तर प्रदेशसह काही राज्यातील सरकारं पणाला लावली. अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा….’