हातांचे करणे। कां पायांचे चालणे। ते होय मजकारणे। तैसे करी ।।1358।। मग भरलेया जगाआंतु। जाऊनि तिजयाची मातु। होऊनि ठायील एकांतु। आम्हां तुम्हां।।1362।। (अध्याय18)
माऊली म्हणतात, भगवान अर्जुनाला सांगताहेत, हातांनी जी जी कृत्ये करशील किंवा पायाने जिकडे जाशील त्या सर्व क्रिया माझ्याचकरिता कर. आपल्या किंवा दुसऱ्याच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या क्रिया करशील, त्या माझ्या ठिकाणी अर्पण करून माझा याज्ञिक हो.
आता अशा किती गोष्टी शिकवू! आपले ठिकाणी सेवकभाव मानून जे सर्वत्र तुला दृष्टीस पडेल, ते सर्व मद्रूप आहे, असे समजून त्याची सेवा कर. मग प्राणीमात्राच्या ठिकाणचा द्वैतभाव नाहीसा होऊन सर्वत्र ठिकाणी मीच आहे, असे तुझ्या अनुभवास येऊन सर्वत्र नम्र होऊन वंदन कर.
एवढ्याने माझा अत्यंत आश्रय तुला प्राप्त होईल. मग सर्व जगात तिसरेपणा नाहीसा होऊन देवभक्ताचा (माझा व तुझा) एकांत झालेला पाहशील.