वनस्पती तुपाचे दोनच डबे विका
पुणे, ता. 12 – वनस्पती तुपाच्या विक्रीवर पुण्याच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. किरकोळ दुकानदार अगर सामान्य गिऱ्हाईक यांना साडेसोळा किलोचे जास्तीत जास्त दोनच डबे विकावेत. अशा परवानाधारकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
केरळमध्ये शाळा-कॉलेज बेमुदत बंद; विद्यार्थ्यांनी धान्य लुटले
त्रिवेंद्रम – विद्यार्थ्यांनी धान्य दुकानांची लुटालूट केल्यामुळे केरळमधील सर्व शाळा कॉलेज उद्यापासून बेमुदत बंद ठेवण्याचा आदेश केरळ सरकारने दिला आहे.
पाक युद्धकैद्यांवर खटले भरणारच
डाक्का – पाक युद्धकैद्यांवर बांगलादेश सरकार खटले भरणार आहे. याबाबत सरकारचा निर्धार पक्का आहे. त्यासंबंधीचे बिल संसदेत मांडण्यात आले आहे. त्यासाठी घटनेत दुरुस्ती करणारे बिल मांडले आहे.
महर्षी शिंदे संशोधक म्हणूनही थोर होते
पुणे – कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे केवळ समाजसुधारकच नव्हते तर मोठे संशोधक होते. गेल्या 50 वर्षांतील संशोधनामध्ये त्यांचे संशोधन अधिक अचूक असल्याचे दिसून येत आहे, असे उद्गार मंगुडकर यांनी चिंचवड महाविद्यालयात बोलताना काढले.
डॉ. मा. प. मंगुडकर म्हणाले की, त्यांच्या काळात भारतीय संस्कृती म्हणजे आर्य संस्कृती असे समीकरण तयार झाले होते. या काळात कर्मवीर शिंदे यांनी या कल्पनेला आव्हान दिले व आर्यपूर्व संस्कृतीचा आर्य संस्कृतीवर फार खोल परिणाम झाला असे सांगितले.
आजचे अस्पृश्य एकेकाळचे राज्यकर्ते होते. त्याचप्रमाणे ते पूर्वीच्या काळातील बौद्ध होते असा सिद्धांत विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रथम मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे हाच सिद्धांत विस्तृत प्रमाणात मांडला.