संसद, विधिमंडळ, प्रचार सभा, विविध वाहिन्यांवरील चर्चा, पत्रकार परिषदा यातील भाषेचा स्तर अत्यंत खालावला आहे. लोकशाही आणि सुधारक विचारांच्या भारतासाठी ही नक्कीच भूषणावह बाब नाही.
अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा त्यांची लोकसभेतील सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगितली होती. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका केली होती. नेहरूंचे दुहेरी व्यक्तिमत्त्व असल्याचा थेट हल्ला केला होता. त्याचदिवशी सायंकाळी दिल्लीतल्याच एका कार्यक्रमात नेहरूंची आणि त्यांची भेट झाल्यावर नेहरूंनी त्यांचा खांदा थोपटला. “आज जोरदार भाषण केले’, असे म्हणत हसत पुढे निघून गेले. हल्ली अशी टीका करणे म्हणजे शत्रुत्वाला आमंत्रण देण्यासारखे आहे. लोक तुमच्याशी बोलणेच बंद करतील अशी खंत वाजपेयींनी त्यावेळी व्यक्त केली. त्यांचे हे भाषण होऊन आता दोन दशकांचा काळ उलटला आहे. खरेतर एका अजातशत्रू नेत्याने काही भूमिका मांडल्यावर सगळ्यांनी समंजसपणे विचार करायला हवा होता. तो कोणीच केलेला नाही. ना विरोधी पक्षातील नेत्यांनी ना वाजपेयी यांच्या पक्षातील नेत्यांनी. त्यांनी जर तसे केले असते तर आज किमान संसद आणि विधिमंडळातील नेत्यांच्या भाषेचा स्तर सुधारला असता. नंतर राजकीय सभांमधील आणि रस्त्यावरील भाषा सुधारता आली असती. तथापि, संवादच नको आणि सौहार्दही नको हे एकदा ठरवले की मार्ग संपतो.
उथळ बोलणे, अश्लील बोलणे, व्यक्तिगत टीका करणे, शिव्यांचा सर्रास वापर करणे हा प्रघातच झाला आहे. पूर्वी एखाद्या नेत्याकडून अपघाताने अपशब्द निघायचा. त्याची दिलगिरीही लगेचच व्यक्त केली जायची. सभागृहात तो शब्द उच्चारला गेला असेल, तर कामकाजातून वगळला जायचा. एवढेच नव्हे, तर माध्यमेही त्याचे अत्यंत संयमित वार्तांकन करत. संबंधित नेत्यांनी यावेळी असंसदीय शब्दांचा प्रयोग केला, असे म्हणून त्या विषयाची बोळवण केली जायची. आता हे सगळेच संपले आहे. विरोधकावर टीका करणे हा हक्क आहे. पण ती टीका मर्यादेत असली पाहिजे. नेत्याच्या भूमिकेवर किंवा विचारांवर असली पाहिजे. आता टीका व्यक्तीवरच होते आहे. त्याच्या कुटुंबावर होते. अर्वाच्य भाषेत होते आहे.
संपवण्याची, मारण्याची भाषा केली जाते आहे. अ, ग, म, भ वाचक शब्दांची मालिका सुरू केली जाते. हे करताना टीका करणारा आपली उंची, अनुभव विसरतो. ज्याच्यावर टीका करतो आहे त्याचे ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्वही विसरतो. काही पदे आहेत. त्यावर व्यक्ती कोणीही असली तरी ती लोकशाही पद्धतीने तेथे आलेली आहे. व्यक्ती मान्य असो वा नसो त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे असते. त्या व्यक्ती एवढीच त्याच्यावर टीका करणाऱ्याचीही ती जबाबदारी असते. घटनात्मक पदांचा उल्लेख एकेरी केला जातो. त्यांची अवहेलना केली जाते. हेही कमी म्हणून हल्ली नेत्यांच्या खासगी आयुष्यातही डोकावले जाते. त्यांच्या कुटुंबातील महिलांवरही अश्लाघ्य टिप्पणी केली जाते. कुठे जाते आहे ही राजकीय संस्कृती?
पन्नास-साठ आणि अगदी सत्तरच्या दशकापर्यंत नेत्यांना मर्यादेचे भान होते. त्यांची भाषा संयमित होती. जे काही बोलायचे त्याच्यामागे तात्विक भूमिका असायची. विचारधारेचे अधिष्ठान असायचे. महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने असे अनेक सुसंस्कृत नेते पाहिले आहेत. बोलताना त्यांचा तोल कधीच ढळला नाही. एखादा शब्द चुकून निसटला असेल तर त्यांनी जाहीरपणे आणि व्यक्तिगतपणे माफी मागण्यात कमीपणा वाटून घेतला नाही. टीका करतानाही चुकीवर बोट ठेवले, वर्मी घाव घातला नाही. आज काय प्रकार आहे… जे विकते ते द्या या गोंडस नावाखाली तारतम्य सुटलेले सगळेच ताटात वाढले जाते आहे. टीव्हीवरील चर्चांवर मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानेही कठोर टिप्पणी केली. त्यावर कुणाचातरी अंकुश असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या चर्चांमधील कथित नेत्यांची वाक्ये, त्यांना मिळणाऱ्या टाळ्या, त्यातून वक्त्याला पुन्हा येणारा हुरूप आणि अधिक आक्रमक शब्दप्रयोग हे सगळे लोकशाहीचे, संस्कृतीचे आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाचे वाभाडे काढणारे असते.
तुमची भाषा तुमच्या एकट्याचेच नाही तर समाजाचे चरित्र व्यक्त करत असते. समाजाची बौद्धिकता, मानसिकता, प्रगल्भता आणि संस्कृती आदी बाबी त्यातून प्रतीत होत असतात. व्यावसायिकता, बाजारवाद, मार्केटिंगची सगळीकडेच घुसखोरी झाली आहे. त्यातून विचारांचे प्रदूषण वाढतच चालले आहे. साहित्य आणि सिनेमा ही समाजाचे व्यापक स्तरावर प्रबोधन करणारी माध्यमे. त्यातल्या त्यात साहित्याचा दर्जा सुदैवाने अबाधित आहे. तथापि, त्याचे वाचक कमी झाले आहेत. सिनेमाची भाषा मात्र कधीच बदलली आहे. आज जाहीरपणे समाजात जी भाषा बोलली जाते आहे ती प्रदूषित भाषा ही सिनेमातूनच आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा दोष मात्र सिनेमाकडे देता येत नाही. त्याचे कारण सिनेमाची जी प्रक्रिया असते त्यात अनेक लोक सहभागी असतात. ते काही चंद्र अथवा मंगळावरून येत नाहीत. ते याच समाजातून उठून तेथे जात असतात आणि कलाकृती सादर करत असतात. त्यांची भाषा ही त्यांनी आसपास जे टिपले असते त्यातून विकसित झालेली असते. या भाषेचा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यापक प्रसार होतो. जे आपल्याकडून त्यांच्याकडे जाते तेच चकचकीत होऊन आपल्याकडे परत येते. ही जी मालिका तयार झाली आहे त्यातच कुठेतरी साखळी तोडली जाणे आवश्यक आहे.
कधी काळी अंडरवर्ल्डमध्ये जे शब्द वापरले जायचे असे म्हणतात ते आज बोलाचालीच्या भाषेत रूढ झाले आहेत. ते पत्रकार परिषदांमध्ये, भाषणांमध्ये आणि विधानभवनातही वापरले जात आहेत. त्यांच्या आकर्षक घोषणा केल्या जातात. ते प्रसारित होऊन पुन्हा तुमच्या घरातच येते. तुमच्याच घरातल्या पुढच्या पिढीवर त्याच शब्दांचे संस्कार होत आहेत. त्या शब्दांचा वापर करणाऱ्याची लकब, त्यावेळचा अविर्भाव याची हुबेहूब नक्कल केली जाते आहे. त्यातून संवाद आणि सौहार्दाच्या भावनेचे सिंचन कसे होणार? या सगळ्यात सुधारणा करण्याची जबाबदारी कोण घेणार? याबाबतीत सगळे मूकदर्शक झाले किंवा गर्दीत उदासीनपणे उभे असलेल्या चेहऱ्यासारखे वागले तर हे पतन असेच सुरू राहणार. त्याचे दुष्परिणाम हे सगळ्यांनाच भोगावे लागणार.