पंजाबला नव्याने आलेला जर्नैलसिंग भिंद्रनवालेच्या रूपातील अमृतपाल सिंग परवडणारा नाही. केंद्र सरकार आणि पंजाब राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील धोका टळू शकतो.
पंजाबमधील अमृतपाल सिंग हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले बनू पाहात आहे, असे दिसते. कारण गत महिन्यात पोलीस ठाण्यात त्याने आणलेला मोर्चा आणि पोलिसांवर आणलेला दबाव यामुळे तेथील सरकार व पोलीस यांच्यावरही दडपण आले आहे. या स्थितीचे गांभीर्य केंद्र सरकारने ओळखावे आणि संभाव्य अनर्थ टाळण्यास कार्यरत व्हावे, असे वाटते. केंद्र सरकार पंजाब राज्य सरकारकडे गैरभाजपा सरकार म्हणून पाहात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. 80च्या दशकात पंजाबने दहशतवादाचे परिणाम चाखले आहेत. अमृतपाल सिंगच्या समोर पोलीस व्यवस्था शरणागत झाल्यामुळे पुन्हा पंजाबात गटबाजी करून अमृतपाल सिंग आपल्या बाजूने अस्वस्थ पंजाबमधील युवकांना वळवू शकतो. यातून वेगळी मागणी करणारा नवीन उच्छादक गट निर्माण होऊ शकतो. पंजाबमध्ये पुन्हा भिंद्रानवाले निर्माण होणे ही तशी धोक्याची घंटा आहे. पंजाबमध्ये 80 च्या दशकात भिंद्रनवाले गटाने खलिस्तानची मागणी करून उच्छाद मांडला होता. यासाठी त्याला सीमेपलीकडून शस्त्रसाठा पोहोच झाला होता. त्यावेळी पंजाबात सामाजिक अस्वस्थता पसरली होती. तत्कालीन केंद्र सरकारच्या विरोधात लोकांचे मत गेले होते. आताही परिस्थिती वेगळी नाही.
आजच्या पंजाबी युवकांची अस्वस्थता आपल्याला उपयोगी पडेल, असे अमृतपाल सिंग मानत आहे. युवकांमधील या अस्वस्थतेमागे हमीभाव, महागाई, बेरोजगारी अशा स्थानिक स्थितीपासून ते रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थकारणावर झालेल्या परिणामापर्यंत अनेक कारणे आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारविरोधात जनमत आहे. नेमक्या याच परिस्थितीचा अमृतपाल सिंग लाभ घेऊ इच्छित आहे. या अमृतपालचा एक सहकारी लव्हप्रीत सिंग तूफान याला पंजाबच्या रूपनगर (रोपडम्) येथील चमकौरसाहिब गुरुद्वाराचे वारिंदर सिंग यांचे अपहरण आणि छळ केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. अजनाला पोलीस ठाण्यात याविषयी दाखल झालेल्या तक्रारीत अमृतपालचेही नाव होते. तुफान याच्या सुटकेसाठी अमृतपालने अजनाला पोलीस ठाण्यावर मोर्चाचा इशारा दिला, तेव्हा हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन अजनाल्यात आसपासच्या ठाण्यांतून 500 पोलिसांची कुमक सज्ज होती. पोलीस ठाण्याबाहेर अडथळे-बॅरिकेड लावले होते. अमृतपाल सिंग व त्याच्या वारिस पंजाब दे संघटनेचे अनुयायी लाठ्याकाठ्या, बंदुका घेऊन मोर्चास आले होते, ते अडथळे तोडून पोलीस ठाण्यात घुसले. त्यांनी सरकारी मालमत्तेचेही नुकसान केले. त्यावेळी अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि पोलीस वाहनांचे नुकसान झाले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतींदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी गुरू ग्रंथ साहिब घेऊन जाणाऱ्या जथाप्रमाणे त्यांचा गट तयार केल्यामुळे पोलीस प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत.
वरिस पंजाब दे या संघटनेचे अनुयायी पोलिसांना आवरत नसल्याने वरिष्ठ आयपीएस अधिकारी नंतर पोहोचले आणि त्यांनी अमृतपालशी चर्चा केली. वारिंदर सिंग यांच्या अपहरणामागे लव्हप्रीत नव्हता, असे अमृतसरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पटवून देण्यात अमृतपाल यशस्वी झाला. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमृतपालच्या मागणीनुसार, लव्हप्रीतला सोडून दिले. पोलिसांनी घेतलेली पडती बाजू पोलिसांना पुढील काळात भोवणारी ठरेल, असे दिसते. वारिंदरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्रथमपासून लव्हप्रीतचे नाव होते; परंतु पोलिसांनी न्यायालयात योग्य ती माहिती दिलीच नाही. याबाबत योग्य तो तपास करणे गरजेचे होते, तसे झाले नाही. अमृतपाल हा धर्मप्रसारक म्हणून पोलिसांनी त्याला सूट दिली आहे का, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
अमृतपाल सिंग याने नोव्हेंबर 2022 रोजी वारीस पंजाब दे संस्थेने एक मोहीम सुरू केली. त्याने अमृत संचार आणि अंमलीपदार्थ विरोधी मोहिमा देखील आयोजित केल्या. अमृतपाल उघडपणे खलिस्तान, शीख धर्माच्या लोकांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी चळवळीचे समर्थन करतो. अमृतपाल सिंगने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली होती की, ज्याप्रमाणे इंदिरा गांधींची हत्या केली होती तशीच अवस्था त्यांची होईल. अमृतपाल सिंग याने खलिस्तानी अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले त्यांचा नायक असल्याचे म्हटले आहे. अमृतपाल हा 1984 मध्ये “ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये मारल्या गेलेल्या भिंद्रनवालेसारखा पोशाख परिधान करतो. त्याच्याभोवती सशस्त्र लोक असतात. त्याने फौजान नावाच्या सशस्त्र लोकांच्या गटासह सुवर्ण मंदिरात प्रवेश केला. त्यांचे समर्थक देखील दुसरा भिंद्रनवाले म्हणून त्याचा गौरव करतात.
अमृतपाल सिंग याचा अप्रत्यक्षपणे हिंसाचारात सहभाग असल्याचे दिसते. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला अमृतपालच्या कारवायांवर सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पंजाबमधील अजनाला पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांना सातत्याने या घटनाक्रमाबाबत कळवत राहणे गरजेचे होते. तेथील पाचही पोलीस ठाण्यांचा कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांनी, शेजारच्या पोलीस ठाण्यांतून जादा कुमक मागवणेही आवश्यक होते. नोंदलेल्या तक्रारीत ज्याचे नाव आहे, त्या इसमाला प्रत्यक्ष ताब्यात घेतल्याची माहितीच आम्हाला नव्हती, असा वरिष्ठांनी केलेला दावा पोकळ होता. या सीमावर्ती राज्यात पुन्हा दहशतवादाचा प्रादुर्भाव होत राहणे धोकादायक आहे. 1980च्या दशकात खलिस्तानी दहशतवाद्यांना सीमेपलीकडून आश्रय आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. सीमेपलीकडून त्या वेळी शस्त्रेदेखील पोहोचत. अमृतपाल त्यांच्या संपर्कात नसला, तरी भविष्यात मोठा धोका संभवतो. अमृतपालच्या समोर अजनालात पोलिसांनी शरणागती पत्करल्यामुळे त्याची महत्त्वाकांक्षा वाढू शकते.
पंजाबमधील गैरभाजपा आप सरकार अजनालाच्या घटनेत कसे अकार्यक्षम ठरले हे दाखवण्यात केंद्रातील भाजपला तात्कालिक राजकीय लाभ वाटू शकतो. पंजाब सरकारवर या प्रकरणात टीका करून केंद्र सरकार स्वस्थ बसेल असेल तर भवितव्यात त्याचे भयंकर परिणाम दिसून येतील. पंजाबमधील अस्वस्थता वाढण्यात केंद्र आणि राज्य सरकारही कारणीभूत आहे. मध्यंतरी झालेले ऐतिहासिक शेतकरी आंदोलन यामुळेही केंद्र सरकारचा या राज्यातील सुसंवाद थांबला आहे. तसेच सद्यस्थितीत असलेले आप सरकार अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडले आहे.